नागपूर : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच ‘मत चोरी’संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षातून गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांना आपले म्हणणे लेखी देण्याचे कळवले आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते शरद पवार यांनीही शनिवारी (९ ऑगस्ट) मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Pawar’s disclosure)
पवार यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना दोन व्यक्ती भेटल्या. त्यांनी विधानसभेच्या २८८ जागांपैकी १६० जागा निवडून आणण्याची खात्री देत होत्या, असे सांगून पवार यांनी राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या दाव्याला दुजोराच दिला आहे. (Pawar’s disclosure)
नागपुरात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी हा दावा केला.
पवार म्हणाले, ‘‘२०२४च्या विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत दोन माणसे भेटायला आली होती. ते राज्यातील २८८ जागांपैकी १६० जागांवरील उमेदवार निवडून आणून देण्याची खात्री देत होते. परंतु, माझा निवडणूक आयोगावर विश्वास असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. कारण राजकारणात अशी माणसे भेटत असतात.’’ (Pawar’s disclosure)
असल्या गोष्टींवर विश्वास नसल्याने मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली. मात्र, लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही दोघांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे पवार म्हणाले.
पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भेटायला आलेले ते दोघे कोण हे मात्र पवारांनी स्पष्ट केले नाही. त्यांचा नाव, पत्ता आपल्याकडे नाही एवढेच शरद पवार यांनी सांगितले.