जमीर काझी : मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. मोदी-शाह यांच्या पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व अन्य खासदाराना दिलेली वागणूक विरोधात काँग्रेसने बुधवारी आक्रमक भाजपा विरोधात एल्गार पुकारला. गांधी भवनपासून भाजपा कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. भाजपाच्या कार्यालयात जाऊन त्यांना संविधान भेट देण्याची काँग्रेसची भूमिका होती पण पोलिसांनी काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना रिगल सिनेमाजवळ ताब्यात घेतले. ‘मोदी हटाव, देश बचाव’, ‘जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है’, या घोषणा यावेळी देण्यात आल्या. (Congress marches on BJP office)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान, आ. भाई जगताप, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, अमित कारंडे, राणी अग्रवाल, झिशान अहमद, ब्रिज दत्त, आनंद सिंग यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
नीटचा पेपर यापूर्वी ७१ वेळा फुटला
यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, १२ वर्षापासून देशात लोकशाही व संवैधानिक मुल्ये बासनात गुंडाळून ठेवली आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी तरुणांची घोर फसवणूक केली आहे. रोजगार तर दूरच आज परिक्षाही व्यवस्थित घेतल्या जात नाहीत. त्यामध्ये सुधारणा व पेपरफुटीवर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केली होती पण मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. नीटचा पेपर हा काही यावर्षीच फुटला असे नाही तर तब्बल ७१ वेळा पेपर फुटला आहे. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज हे अभियान हाती घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी लढा पुकारला आहे. दिल्लीत हजारो विद्यार्थी एकत्र आले असून मोदी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करत आहेत. पण त्यांच्यावर मोदी शाह यांच्या पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे व अमानुष लाठीचार्ज केला आहे. लहान मुले, मुलींवरही अत्याचार करण्यात आले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर विदयार्थ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन केले पण अत्याचारी सरकारने विरोधी पक्षांचा व विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला नाही उलट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अत्यंत वाईट वागणूक देत उचलून घेऊन गेले. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे खासदार पदाधिकारी व नेते यांना तीन तास डांबून ठेवले, मोदी सरकारीच ही कृती हुकूमशाहला लाजवणारी आहे. (Congress marches on BJP office)
वंचितच्या बंदला काँग्रेसचा पाठिंबा
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना दिलेली वागणूक, दिल्ली पोलिसांचा अत्याचार या प्रकरणी नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी जाहीर माफी मागावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. परीक्षांमधील अनियमिततेबाबत संसदेत त्वरित चर्चा करावी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व एफआयआर (FIR) आणि खटले त्वरित मागे घ्यावेत अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. हा लढा यापुढेही सुरुच राहणार आहे, मविआतील नेत्यांशी चर्चा करून पुढील रणनिती ठरवली जाणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंद बद्दल बोलताना, काँग्रेसचा वंचितच्या बंदला पाठिंबा असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. तर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट यावर शरद पवार व त्यांच्या पक्षातील नेतेच भाष्य करू शकतील, असेही त्यांनी सांगितले. (Congress marches on BJP office)