‘मॅड सखाराम’ माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे प्रामाणिकपणे नाटक करायला घेतलं आणि बघता बघता आज ‘मॅड’ने ६० प्रयोगांचा टप्पा गाठलाय… हा लेख छापून येईल तेव्हा कदाचित ६५-७० प्रयोग झालेले असतील. आजच्या काळात एखाद्या प्रायोगिक नाटकाचे एवढे प्रयोग होणं, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कार मी अनुभवला आहे. वर्तमानाला थेट भिडणारं हे नाटक उपहास, उपरोधाचा अचूक वापर करत अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य घेऊ पाहणाऱ्यांना दिलासा तर देतच; परंत, कधी टपल्या, कधी कोपरखळ्या तर कधी निखळ विनोदाचा आधार घेत प्रस्थापित व्यवस्थेलाही फटकारे देतं. या नाटकाला हात घालणं म्हणजे माझ्यासाठी हवाहवासा मॅडनेस अनुभवणं होतं… (Mad Sakharam)
- मंगेश सातपुते
दोन हजार अठरा हे पु. ल. देशपांडेंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. त्या वर्षी मला असं वाटलं की पुलंच्या एखाद्या अस्पर्शित साहित्यकृतीवर आधारित नाटक बसवावं. म्हणून सुनील कर्णिक सरांना फोन केला. (सुनील कर्णिक सर हे पत्रकारितेतलं खूप मोठं नाव. माझ्यासाठी प्रचंड वाचन असलेलं आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व.) त्यांनी लगेच ‘म राठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ हे पुस्तक सुचवलं. मी ताबडतोब ते वाचून काढलं. पुढे त्याचं नाट्यरूपांतर माझे पत्रकार मित्र ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी करून दिलं आणि पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात ‘मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास’ या नावाने ते रंगमंचावर दाखल झालं. त्याचे प्रयोग अजूनही सुरू आहेत. कारण एकच. ते पुलंच्या पुस्तकावर आधारित आहे ! (Mad Sakharam)
२०१९ साली ‘जे जे होईल ते ते पहावे’ हे नाटक केलं. त्यानंतर २०२०-२१ ही कोविडची दोन वर्षं अशीच भाकड गेली. २०२२ साली पुन्हा एकदा नवीन नाटकासाठी शोधाशोध सुरू केली. पण कुणीच नाटक लिहून देईना. अगदी माझ्याकडचे विषय देऊनसुद्धा! मग पुन्हा एकदा पुस्तकांकडे, पर्यायाने साहित्याकडे वळलो. पुलंचं’आम्ही लटिके ना बोलू’ हे नाटक शोधत असताना हाती लागलं. पुलंनीच लिहिलेलं, ‘भगवान श्री सखाराम बाइंडर !’
सखाराम नव्याने गावला
‘भगवान श्री सखाराम बाइंडर’ हे पुस्तक विकत घेऊन घरी आलो. नाटक वाचलं आणि वाचत असताना एकटाच खदाखदा हसत होतो. अक्षरशः लोळत होतो ! कारण त्यातली भाषा आणि त्यातले विनोद हे वेगळ्याच दर्जाचे होते. त्याचं कारण असं की तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ मी यूट्यूबवर बघितलं होतं आणि वाचलंही होतं. तेंडुलकरांची दोन नाटकं मला कॉलेजला असताना अभ्यासाला होती. एक होतं ‘कन्यादान’ आणि दुसरं होतं, ‘घाशीराम कोतवाल’. या दोन्ही नाटकांवर प्रोजेक्ट केले होते कॉलेजमध्ये असताना. कारण मी साहित्याचा विद्यार्थी, बी.ए. आणि एम.ए. दोन्ही मराठी साहित्यात केलं.(Mad Sakharam)
तर सांगायचं असं, की तेंडुलकरांच्या नाटकांचा तर मी फॅन होतोच, पण ‘सखाराम बाइंडर’वर जो गदारोळ उठला, १९७२ साली, त्या वादंगावर प्रतिक्रिया म्हणून पुलंनी हे नाटक लिहिलं, हे लगेच लक्षात आलं. त्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली, ही नाटिका (दीर्घाक) पुलंनी विजय तेंडुलकरांच्या समर्थनार्थ लिहिलेली आहे. म्हणजे त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी लिहिलेली आहे ! तुम्ही नाटककाराचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. त्याला जे म्हणायचं आहे, ते त्याला म्हणू द्या, हे पुलंना त्यातून अधोरेखित करायचं आहे. कारण पुलंनी इतर जी विडंबनं लिहिली, ती टिंगलटवाळी करण्याच्या हेतूने किंवा थट्टामस्करी करण्याच्या हेतूने लिहिली. त्यांनी तसं नमूद केलेलं आहे सुरुवातीलाच. हा एक वेगळा मुद्दा लक्षात आल्यानंतर प्रचंड भारावून गेलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘भगवान श्री सखाराम बाइंडर’च्या पहिल्या पानावर श्रेयनामावलीच नव्हती.
नव्याचा शोध
म्हणजे ते नाटक कधी झालं? कुठल्या साली त्याचा पहिला प्रयोग झाला? कोणी दिग्दर्शित केलं ? कुठल्या संस्थेने केलं? कुठल्या नाट्यगृहात त्याचा पहिला प्रयोग झाला? हेही त्या पुस्तकात नव्हतं लिहिलेलं. मनात म्हटलं, ‘हे भारी आहे. हे भन्नाट आहे. आपण असंच तर काहीतरी शोधत होतो, जे अत्यंत नावीन्यपूर्ण असेल आणि आजच्या काळाशी सुसंगत असेल. आजच्या काळातही लागू होणारे असेल, अगदी चपखल. (Mad Sakharam)
खरं सांगायचं तर आपण अशा प्रकारची साहित्यकृती शोधत होतो, त्याच्या मागची प्रेरणा कुठेतरी मागे कॉलेजमध्ये आहे! हेही नंतर जाणवलं. कारण जेव्हा कॉलेजला होतो आणि एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेत होतो कॉलेजतर्फे, तेव्हा आम्हाला अकरावी, बारावीला प्राध्यापक विजय तापस सर होते आणि ते आमच्या ‘नाट्यवलय’चे इन्चार्ज होते. त्या वेळी त्यांनी ‘संगीत मूकनायक’ नावाची छोटीशी नाटिका जी राम गणेश गडकरी यांनी लिहिली होती, ती शोधून काढली होती. ‘संपूर्ण गडकरी’ या पुस्तकातून.
पात्रांची घडण
‘सखारामा’च्या भूमिकेत माझा मित्र सुनील जाधवच दिसत होता. त्याला कारण त्याची देहयष्टी. त्याचं उंच, धिप्पाड व्यक्तिमत्त्व. कारण पुलंच्या नाटकातला जो सखाराम आहे, तो पूर्णपणे वेगळा आणि संतपदाला पोहोचलेला किंवा तसा आव आणणारा असा सखाराम पुलंनी रेखाटला होता. म्हणून मला त्याचं व्यक्तिमत्त्व अगदी उलट हवं होतं, जे मला सुनीलमध्ये सापडलं. त्याला नाटक वाचून दाखवल्यानंतर त्यालाही ते आवडलं आणि तो लगेच ते करायला तयार झाला. कारण त्याच्यासाठी अशा पद्धतीची भूमिका ही त्याने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि खूप आव्हानात्मक होती, म्हणून ही त्याने लगेच होकार दिला. त्यानंतर लक्ष्मी (किरण प्रधान), चंपा (अलका परब), लेखक (श्रेयस वैद्य) आणि दाऊद (विशाल मोरे) या भूमिकांसाठी योग्य अभिनेते-अभिनेत्री शोधणं, ते तसे मला सापडणं हेही सगळंच खूप नाट्यमय होतं. कारण हे सगळे माझ्या आसपासच होते. माझ्यासोबत डबिंगच्या क्षेत्रात काम करत होते.

विनोदाची जाण
सुनील काय किंवा किरण श्रेयस, विशाल, अलका काय हे सगळे माझ्यासोबत डबिंग करतात म्हणून ते नाटकात नाहीत, तर ते उत्तम नट आहेत. त्या प्रत्येकाकडे त्यांचा असा एक सेन्स ऑफ ह्युमर आहे; ज्याला आपण पिंड म्हणतो, विनोदाचा. विनोदाची जाण आहे, अभिनयाची जाण आहे, म्हणून ते नाटकात काम करतायत आज. माझा दिग्दर्शक म्हणून विनोदाकडे बघण्याचा एक दृष्टिकोण आहे. कारण विनोदामध्येसुद्धा खूप प्रकार असतात. असो.
तर, अशी सगळी टीम जमा केल्यानंतर साधारण ऑक्टोबरमध्ये आम्ही तालमीला सुरुवात केली. जवळ जवळ दोन महिने तालमी केल्यानंतर १८ डिसेंबर २०२३ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली मिनी थिएटरमध्ये झाला. तालमीत खूप मजा आली. कारण मला प्रयोगापेक्षा नाटक बसतानाच्या प्रक्रियेची मजा घ्यायला जास्त आवडतं. अर्थातच, माझ्यासाठी हे नाटक खूप आव्हानात्मक होतं. कारण लेखक पु. ल. देशपांडे. ज्यांचं बरंच लिखाण अवघ्या महाराष्ट्राने वाचलेलं आहे. त्यातून पुन्हा त्यांच्या दोन-तीन पुस्तकांवर व्यावसायिक रंगभूमीवर नामांकित दिग्दर्शकांनी नाटकं दिग्दर्शित केली आहेत आणि ती धो धो चाललीसुद्धा आहेत. प्रचंड पैसा कमावलाय त्या नाटकांनी. त्यात खेळिया पुलंचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.
जयंत पवार आणि अनिल बांदिवडेकर
हे सगळं डोक्यात सुरू असताना मी मात्र माझ्या दिग्दर्शनाच्या बाबतीत ठाम होतो. त्यात माझा आत्मविश्वास वाढवला डॉ. अनिल बांदिवडेकर सरांनी. त्यांना स्क्रिप्ट वाचून दाखवलं तेव्हा ते प्रचंड खूश झाले. खरं सांगायचं, तर जयंत पवार सर हे माझे आधीचे मेंटॉर होते. ज्यांना मी माझं कुठलंही (माझ्या लेखकाने लिहिलेलं) नाटक दिग्दर्शित करण्यापूर्वी स्क्रिप्ट वाचायला द्यायचो. त्यांचं मत घ्यायचो आणि त्याप्रमाणे माझ्या नाटकांमध्ये बदल करायचो आणि मगच तालमीला सुरुवात करायचो. पण जयंत सर गेल्यानंतर अनिल सरांनी ती जागा भरून काढली. त्यांच्यासमोर झालेल्या वाचनानंतर ते ठामपणे पाठीशी उभे राहिले. म्हणाले, “मंगेश तू जा पुढे. मी आहे सोबत तुझ्या ! तू करशील ते चांगलंच करशील. स्क्रिप्टही मुळात तगडं आहे; भन्नाट आहे.” डॉक्टरांच्या या शब्दांनी माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. आजही ते पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. (Mad Sakharam)
रंगल्या तालिमी ऐशा…
आम्ही संध्याकाळी तालीम करायचो. आपापली पोटापाण्याची कामं आटपून संध्याकाळी ६ ते रात्री १० अशी तालमीची वेळ असायची आमची. दोन महिने तालमीमध्ये खूप मजा आली. प्रत्येकाला तसं त्याचं त्याचं कॅरेक्टर सापडणं, हे थोडसं सुरुवातीला जड गेलं. कारण पुलंनी पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेला विनोद आजच्या वनलाइनर्सच्या जमान्यात नटांना पचनी पडणं तसं अवघड होतं. प्रेक्षकांसमोर तर ते आल्यानंतर कळणार होतं, की ते कसं पोहोचतंय. पोहोचतंय किंवा पोहोचत नाही. पण तालमीत असं लक्षात आलं की पुलंनी त्यातला जो विनोद आहे; त्या विनोदाचं उपरोध, उपहास, अतिशयोक्ती, वक्रोक्ती असे विविधालंकार वापरून एक अजब रसायन तयार करून ठेवलं आहे, तो अजबगजब विनोद आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे.
वाचिक अभिनयावर भर
पंधरा दिवसानंतर कंबर कसली आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरून नटांना (सहकाऱ्यांना) ते वेगवेगळ्या पद्धतींनी समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. तत्पूर्वी न कळलेले विनोद आणि संदर्भ माझे सर चंद्रशेखर पाटील यांच्याकडून समजून घेतले. साधारण महिनाभर वाचन केल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या वाक्यांवर कमांड आल्यानंतर खरी गंमत, खरी रंगत यायला लागली. त्यांच्यात ते कुठेतरी झिरपायला लागलं होतं, मी सांगितलेलं. पुलंची विनोदाची शैली, कुठल्या वाक्यात नेमका कुठला विनोद आहे, हे सगळं हळूहळू त्यांना कळायला लागलं होतं आणि त्यानंतर ते आपसूकच पात्रांच्या दिशेने यशस्वी प्रवास करू लागले होते. साधारण दीड महिना आम्ही फक्त वाचन करत होतो. माझ्या कामाची पद्धतच अशी आहे, की मी वाचिक अभिनयावर जास्त भर देतो. कारण मला वाक्यांमध्ये दडलेल्या गमतीजमती बाहेर काढायला खूप आवडतं. स्क्रिप्टवर काम करायला खूप आवडतं. अर्थातच त्यामुळे तुमचा नाटकाचा पाया भक्कम होतो आणि जर पाया भक्कम असेल तर मग पुढे इमारत बांधायला, इंटिरियर करायलाही खूप मजा येते.
संकटांची नाटकं
नाटकाची निर्मिती मी आणि सुनीलने मिळून करायची असं ठरलं असल्यामुळे पैशाचा प्रश्न सुटला होता; जो सगळ्यात महत्त्वाचा असतो. पण माझा अनुभव असा होता, नाटक किंवा इतर कामं करायला घेतली की संकटं माझ्यावर अक्षरशः चालून येतात. सगळं सुरळीत चाललेलं असताना. तशात मला एक कल्पना सुचली. पुलंनी ‘भगवान श्री सखाराम बाइंडर’ लिहिताना अगदी सुरुवातीपासून निवेदन म्हणून जे लिहिलं होतं आणि मधे मधे असंख्य रंगसूचना लिहून ठेवल्या होत्या ज्या खरंतर त्यांच्या एक्सपर्ट कॉमेंट्स आहेत, वेगवेगळ्या विषयांवरच्या. म्हणजे सेन्सॉर बोर्डावर कॉमेंट होती किंवा लेखकावर कॉमेंट होती; तथाकथित संस्कृतिरक्षकांवर कॉमेंट होती. आणि अचानक कल्पना सुचली की ह्या रंगसूचना आपण कोणाच्यातरी आवाजात रेकॉर्ड करण्याऐवजी, आपल्याकडे एक चांगला नट आहे श्रेयस वैद्य, जो दाऊदचा रोल करतोय, त्याला जर आपण लेखक म्हणून किंवा लेखकाचं पात्र म्हणून स्टेजवर आणलं तर? आणि संकटाला सुरुवात झाली.
कंसातील वाक्ये नटाच्या तोंडी
खरंतर त्याला तर संकट नाही म्हणता येणार. ही एक अतिशय उत्तम कल्पना होती, की पुलंनी लिहिलेल्या रंगसूचना (कंसातील वाक्ये) प्रत्यक्ष नटाच्या तोंडी द्यायच्या. पण गंमत अशी झाली की आता श्रेयस जर लेखकाचा रोल करणार किंवा निवेदकाचा रोल करणार किंवा सूत्रधाराचा रोल करणार, तर मग दाऊदचा रोल कोण करणार? आणि माझ्या डोक्यात पुन्हा एकदा लक्ख प्रकाश पडला. विशाल मोरे. तो माझाच सहकारी. रुईया कॉलेजचा आणि तो परफेक्ट जाणार होता दाऊदच्या कास्टिंगला. त्यामुळे मी विशालला अक्षरशः शेवटचे पंधरा दिवस असताना तालमीला बोलावून घेतलं. तोही पंधरा दिवसांत टेचात उभा राहिला. आज श्रेयस आणि विशाल या दोघांनाही सुनील, किरण, अलकाच्या तोडीनेच चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. शाबासकी मिळते.(Mad Sakharam)
मॅडनेसचा शुभ प्रारंभ
शुभारंभाच्या प्रयोगाला चिन्मय सुमित, डॉ. अनिल बांदिवडेकर, प्रदीप कबरे, गोट्या सावंत ही सगळी मंडळी माझ्या विनंतीला मान देऊन आली होती. प्रयोग अतिशय सुंदर झाला. त्याला कारण आमची दोन महिन्यांची मेहनत. उपस्थित सर्व प्रेक्षकांनी प्रयोग प्रचंड एन्जॉय केला. नाटक संपल्यानंतर जेव्हा डॉक्टर भेटायला आले बॅकस्टेजला, तेव्हा त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. “एक श्रीमंत प्रायोगिक नाटक केलंस तू मंग्या.” आणि मला कळून चुकलं की आपण जे धाडस केलंय, ते यशस्वी झालंय. (Mad Sakharam)
सगळ्यांनीच कौतुक केल्यामुळे आम्हा सगळ्यांचाच जीव एकदाचा भांड्यात पडला आणि पुढील वाटचाल सुरू झाली. पण एक साधारण जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्येच
माझी आर्थिक परिस्थिती थोडी डळमळीत झाली. (Mad Sakharam)
त्यामुळे मी सुनीलला म्हटलं की, “अरे, मला यापुढे आर्थिक हातभार नाही लावता येणार, तर तू तुझा एखादा मित्र बघ. जो नाटकवेडा असेल आणि तो आपल्याला आर्थिक मदत करायला तयार होईल.” तर त्याने क्षणभरही विचार न करता नाव घेतलं. सुरेश जाधव. “सुरेश आपल्याला नक्की मदत करेल. सुरेश आपल्यासारखाच नाटकवेडा आहे. तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.” मी मनात हुश्श म्हटलं आणि सुरेशच्या होकाराची वाट पाहत असतानाच सुरेशने कसलाही विचार न करता होकार दिला. त्या क्षणापासून तो पाठीशी उभा राहिला. आजतागायत तो आमच्या पाठीशी उभा आहे.
बॅकस्टेजचा डोलारा
नाटक उभं करताना सगळ्यात जास्त मदत झाली, ती तंत्रज्ञ मंडळींची. नेपथ्य केलं आमचाच मित्र, आजचा आघाडीचा नेपथ्यकार संदेश बेंद्रे याने. त्याने खरंतर खूप मोलाची मदत केली. कारण सखारामच्या एवढा मोठा सेट (रिअलिस्टिक घर) तयार करणं, त्यासाठी लागणारा आर्थिक खर्च हा काही आम्हाला झेपण्यासारखा नव्हता. नेपथ्याची जबाबदारी संदेशने घेतली. त्याने ती पार पाडली. त्यानंतर या नाटकाचं संगीत मंदार कमलापूरकर या माझ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या साऊंड डिझायनर मित्राने केलं. जेव्हा मी त्याला स्क्रिप्ट ऐकवलं, तेव्हा त्याला ते इतकं आवडलं की तो लगेच तयार झाला. त्याने अप्रतिम बॅकग्राऊंड म्युझिक केलं नाटकाचं. त्यानंतर आजचा आघाडीचा प्रकाश योजनाकार आमचा अमोघ फडके त्यानेसुद्धा खूप छान प्रकाशयोजना केली नाटकाची. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता वेषभूषाकार महेश शेरला हा आणखी एक मित्र. त्यानेही अप्रतिम वेषभूषा केली.
या सगळ्यांचीच खूप मदत झाली. त्यांच्याशिवाय मॅड सखाराम अपूर्ण आहे; अपूर्ण होता आणि आणि अपूर्ण राहील. मी सतत मदत हा शब्द वापरतोय त्याला कारण प्रायोगिक नाटकात मानधन नसतं, हे माहीत असूनसुद्धा केवळ नाटकाच्या प्रेमापोटी आपलं काम चोख करायचं हे सोपं नाही. (Mad Sakharam)
‘सो कुल’ पाठिंबा
मला आजही तो दिवस लख्ख आठवतो. १२ एप्रिल २०२४ या दिवशी आमचा प्रयोग होता शिवाजी मंदिरला आणि त्या दिवशी सोनाली कुलकर्णी प्रयोग बघायला आवर्जून आली होती. प्रयोग संपल्यानंतर ती खूप खूश दिसत होती आणि अस्वस्थही. ती सगळ्यांना भेटली. प्रत्येकाचं कौतुक केलं. दुसऱ्या दिवशी ती फोनवर माझ्याशी पंधरा मिनिटं बोलली. अर्थातच ती माझं आणि माझ्या टीमचं कौतुक करत होती आणि पुलंविषयी, पुलंच्या ग्रेटनेसविषयी बोलत होती. एका समकालीन लेखकाच्या पाठीशी दुसऱ्या लेखकाने उभं राहणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे; हाच खरा महाराष्ट्र आहे, असं तिच्या बोलण्याचं सार होतं.

फोन ठेवल्यानंतर तिने एक रक्कम मला ट्रान्सफर केली. म्हणाली, “मी काल जे नाटक पाहिलं, त्याची किंमत २०० रुपये नसून ही रक्कम आहे; जी मी तुला आत्ता पाठवली.” तत्काळ तिला फोन लावला. तिचे आभार मानले. तिला म्हटलं की, “खरंतर आम्हाला पैसे नकोत, पण तुझं नाव दिलंस किंवा तू आमचं नाटक प्रेझेंट केलंस, प्रस्तुतकर्ता म्हणून तुझं नाव दिलं, तर आम्हाला खूप आवडेल. त्याने आमच्या नाटकाची प्रेक्षकसंख्या वाढायला मदत होईल.” तर ती म्हणाली, “मी नुसतं नाव देणार नाही मंगेश, मी त्यातला खर्चाचा जो वाटा आहे, तोही उचलणार.”
मी तिला खूप विनवून पाहिलं, “पैशांची काही गरज नाही. पैशाने नाती बिघडतात. व्यवहार आला की मैत्री तुटते. त्यापेक्षा तू फक्त तुझं नाव दे.” पण ती तिच्या मतावर ठाम होती. तिने तिच्या नकळत पुलंच्या पावलावर पाऊल ठेवलं होतं. एका दर्जेदार कलाकृतीच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली होती, जसे पुलं विजय तेंडुलकरांच्या पाठीशी उभे राहिले होते. ही बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये छापून आली आणि त्यानंतर आमच्या नाटकाचं नशीबच पालटलं.
अपनी तो चल पडी मामू !
‘मॅड सखाराम’ने त्यानंतर आजतागायत मागे वळून पाहिलं नाही. प्रेक्षकसंख्या तर वाढलीच, पण प्रसारमाध्यमांनी आमची चांगली दखल घेतली. नाटक पुलंचं आहे, त्याचबरोबर ते पन्नास वर्षांत कोणी केलं नाही आणि सोनाली कुलकर्णी या नाटकाच्या पाठीशी उभी आहे, असा अपूर्व योग जुळून आला. नाटकाची घोडदौड सुरू झाली. त्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर प्रयोग केले. माणगाव (डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिन), जळगाव (मैत्र महोत्सव, आयोजक शंभू पाटील) भुसावळ (खानदेश महोत्सव, अनिल कोष्टी), कुडाळ (बाबा वर्दम नारायण महोत्सव) कणकवली (वामन पंडित) इथल्या नाट्य महोत्सवांमध्ये आग्रहाने बोलावणं आलं. त्याचबरोबर नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) तसेच एनसीपीए या नामांकित संस्थांनीसुद्धा आम्हाला प्रयोग करण्याची संधी दिली, ती केवळ सोनालीमुळेच !
१८ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झालेला प्रवास आधी रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी प्रयोगाचा टप्पा गाठू शकला. हे केवळ पुलंची पुण्याई आणि सोनालीचा खंबीर पाठिंबा या दोन गोष्टींमुळेच शक्य झालं. मला खात्री आहे की शतक महोत्सवी प्रयोगाचा टप्पादेखील आम्ही सारे नक्कीच गाठू ! कारण आम्ही सारे मॅडच आहोत की !
थैंक्यू सखाराम !
आज ‘मॅड सखाराम’ या नाटकाने मला काय दिलं असा माझ्या मनात प्रश्न येतो तेव्हा जाणवतं, की या नाटकाने मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगण्याचं बळ दिलं. कारण माझ्या आयुष्यातून नाटक वजा केलं, तर काहीच उरत नाही हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं होतं, जेव्हा मी व्यावसायिक नाटकांमध्ये थोडंसं अपयश पचवूनसुद्धा पुन्हा प्रायोगिक रंगभूमीकडे वळलो. मला असं जाणवलं की आपल्याला जे करायचं असतं, ते इथेच खऱ्या अर्थाने करायला मिळतं किंवा प्रयोग करायला मिळतोय. आपल्या कल्पना प्रत्यक्षात मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य प्रायोगिक रंगभूमीवरच मिळतंय. याच जाणिवेतूनच मी ‘मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास’, त्यानंतर ‘जे जे होईल ते ते पहावे’ आणि त्यानंतर ‘मॅड सखाराम’ ही सलग तीन प्रायोगिक नाटकं रंगभूमीवर सादर करू शकलो. (Mad Sakharam)
पुस्तकांनी जगण्याची उमेद
दरम्यानच्या काळात वैयक्तिक आयुष्यात खूप पडझड झाली होती. त्यामुळे मानसिक खच्चीकरण तर झालंच होतं, पण जगण्याची उमेद कुठेतरी हरवून बसलो होतो. अशा काळात मला पुस्तकांनी जगण्याची उमेद दिली. लॉकडाऊननंतर अक्षरशः मला वाचनाचं वेड लागलं. त्यामुळे पुलंनी लिहिलेलं ‘भगवान श्री सखाराम बाइंडर’ या वाचनवेडापायी माझ्या हाती लागलं. या नाटकाने माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. एक दिग्दर्शक म्हणून मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. नाटक, सिनेसृष्टीतल्या दिग्गजांपर्यंत पोहोचवलं.
‘हे नाटक तुला कुठे सापडलं ? आम्ही कसं वाचलं नाही आजपर्यंत ? तू हे नेमकं कसं शोधलंस? व्हॉट्सअॅपवर फोटो पाठव त्या पुस्तकाचा, पहिल्या पानाचा. प्रकाशन कुणाचं आहे, त्या पानाचा फोटो पाठव’, असे असंख्य फोन आले. हे सगळं फार रंजक होतं माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी. पण मी शांत होतो. कारण सेन्सॉर सर्टिफिकेट माझ्या नावावर होतं. (Mad Sakharam)
बुवाबाजीवर भाष्य
तेंडुलकरांनी (Vijay Tendulkar) ‘सखाराम बाइंडर’ या नाटकातून लग्नसंस्थेला प्रश्न विचारला होता आणि पुलंनी त्यांच्या ‘सखाराम’ मधून त्यांच्या मॅड शैलीत बुवाबाजीवर भाष्य केलं होतं. मला आणि माझ्या टीमला ते उमगल्यामुळेच आम्ही यशस्वी झालो होतो. तालमीच्या दरम्यान म्हणजे, रोज रात्री तालीम संपवून मी घरी आल्यानंतर कमलाकर सारंग यांचं ‘बाइंडरचे दिवस’ हे पुस्तकदेखील वाचत होतो. त्यांना कधी भेटलो नाही, पण आज त्यांची प्रकर्षाने आठवण येते. तेव्हाच्या तथाकथित संस्कृतिरक्षकांनी त्यांच्या बाइंडरवर आक्षेप घेतल्यानंतर प्रयोग व्हावेत म्हणून त्यांनी दिलेला लढा आणि केलेला संघर्ष यापुढे मला माझ्या जगण्याचा संघर्षसुद्धा थिटा वाटतो. खरंच, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, कमलाकर सारंग ही खूप मोठी माणसं होती. आपल्या समकालीन लेखकाच्या पाठीशी उभं राहणं ही साधी गोष्ट नाही. पण ती पुलंनी करून दाखवली. अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सोनाली कुलकर्णी ‘मॅड’च्या पाठीशी उभी राहिली, हीसुद्धा ऐतिहासिक गोष्टच म्हणावी लागेल. हीच महाराष्ट्राची ‘खरी’ संस्कृती!
***
(सामाजिक जाणिवा जपत रंगभूमीवर कारकीर्द घडवणाऱ्या दिग्गजांचा वारसा पुढे नेणारे अशी मंगेश सातपुते यांची ओळख आहे. संपर्कः ९९३०५ ५३३१८)
(समतावादी मुक्त संवाद पत्रिका – दिवाळी विशेषांक २०२५ मधून साभार)