क्वालालंपूर : भारतीय संघाने रविवारी १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ९ विकेटनी सहज विजय मिळवला. या विजयासह गतविजेत्या भारताने ‘ग्रुप ए’मध्ये २ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. (World Cup)
सलामीच्या सामन्यात भारताची कर्णधार निकी प्रसादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तिचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत अवघ्या ४४ धावांमध्ये वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळला. विंडीजच्या संघातील केवळ दोन खेळाडूंनाच वैयक्तिक दहा धावांचा टप्पा ओलांडता आला, तर पाच खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. भारताच्या परुणिका सिसोदियाने तीन, तर व्हीजे जोशिता आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (World Cup)
वेस्ट इंडिजचे हे किरकोळ आव्हान भारताने अवघ्या ४.२ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पार केले. कमलिनीने १३ चेडूंमध्ये ३ चौकारांसह नाबाद १६, तर सानिकाने ११ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह नाबाद १८ धावा करून भारताचा विजय साकारला. भारताची वेगवान गोलंदाज जोशिता सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. या स्पर्धेमध्ये भारताचा पुढचा सामना २१ जानेवारीला मलेशियाविरुद्ध होणार आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने यजमान मलेशियावर १३९ धावांनी मात केली. श्रीलंकेने या सामन्यात ६ बाद १६२ धावांचे आव्हान उभारल्यानंतर मलेशियाचा संघ अवघ्या २३ धावांत सर्वबाद झाला. (World Cup)
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज – १३.२ षटकांत सर्वबाद ४४ (असाबी कॅलेंडर १२, केनिका गिल्बर्ट १५, परुणिका सिसोदिया ३-७, व्हीजे जोशिता २-५, आयुषी शुक्ला २-६) पराभूत विरुद्ध भारत – ४.२ षटकांत १ बाद ४७ (जी. कमलिनी नाबाद १६, सानिका चाळके नाबाद १८, जेहझारा क्लॅक्सटन १-१८).
हेही वाचा :
विमेन्स प्रीमियर लीग १४ फेब्रुवारीपासून