अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्यावर माजी मंत्री, माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. राज्याच्या इतिहासात फडणवीस हे सर्वात क्रूर मुख्यमंत्री असल्याची टीका ठाकूर यांनी केली आहे. (Yashomati Thakur)
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० ब मध्ये भाजपचे आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आले. ते मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ आहेत. मामेभावाला विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मतदारसंघात दमदाटी केली. पदाचा दुरुपयोग केला, विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या दिल्या, पैसे दिले असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. (Yashomati Thakur)
यशोमती ठाकूर म्हणाल्या. अमरावतीमध्ये भाजप पक्ष रवी राणा, नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे. देवेंद्र फडणवीस याठिकाणी दमदाटी, गुंडागर्दी करतात. मुख्यमंत्रीपदाचा सर्रास दुरुपयोग त्यांनी केला. उमेदवारांना धमक्या दिल्या, कोणाला पैसे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील, असेही ठाकूर म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस हे हिशोबाने संविधानाची तोडफोड करत आहेत. हे योग्य नाही. त्यांच्या भाजपमध्ये ओरिजनल लोक कमी आणि भाड्याने आणलेले जास्त आहेत. आल्हाद कलोती यांचा पराभव झाला असता तर देवेंद्र फडणवीस यांची नाचक्की झाली असती, म्हणून त्यांनी दमदाटी करुन मामेभावाला बिनविरोध निवडून आणले, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. (Yashomati Thakur)