मुंबई : प्रतिनिधी : राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या मागे लागल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
स्थगन प्रस्ताव मांडत असताना वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. ब्रह्मपुरी शहरात गेल्या काही दिवसांत १० वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती वडेट्टीवार यांनी दिली. यापैकी केवळ दोन मुलींचा तपास लागला असून चार जणी अजूनही बेपत्ता आहेत. सरकार सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मग तालुका स्तरावर या व्यवस्था कुठे आहेत? मुलींचे अपहरण होत असताना आणि त्यांचे मोबाईल बंद असताना पोलीस यंत्रणा काय करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करण्याची गरज असून, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. (Vijay Wadettiwar takes an aggressive stance on farmers’ issues)
राज्यात अवकाळी आणि गारपीट झाली. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर वरील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नांदेड, हिंगोली, धाराशिव,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील स्थिती अत्यंत गंभीर आहे. या नैसर्गिक आपत्तीत ४१ जनावरे दगावली असून दोन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकार केवळ कर्जमाफीच्या पोकळ गप्पा मारत आहे. अद्याप अनेक ठिकाणी पंचनामेही सुरू झालेले नाहीत. सरकारने तात्काळ निवेदन करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. राज्यात शेतकरी मरत आहे, मुली सुरक्षित नाहीत, पण सरकार मात्र भोंदू बाबांच्या मागे धावण्यात धन्यता मानत आहे. पालकांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही का?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. (Vijay Wadettiwar takes an aggressive stance on farmers’ issues)