मुंबई : जमीर काझी : मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा वाढत असताना आता विरोधकांबरोबरच सत्ताधारी आमदारही त्याबाबत उघड भूमिका घेत आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी केली आहे. (All party MLA met Vikhe)
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांना शनिवारी (३० ऑगस्ट) निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. संदीप क्षीरसागर, अजित पवार गटाचे आ. प्रकाश साळुंके, आ. विजयसिंह पंडित आणि भाजपा आ. सुरेश धस यांनी संयुक्तपणे ही मागणी केली आहे. त्यामुळे सरकारमध्येही पक्षातील मराठा आमदारांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. (All party MLA met Vikhe)
आझाद मैदानावर शुक्रवारपासून सुरू झालेल्या आंदोलनाला या चारही आमदारांनी भेट देऊन जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर ते शनिवारी सकाळी उपसमितीचे अध्यक्ष विखे -पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी मराठा आरक्षणाचा तातडीने तोडगा निघावा यासाठी, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका मांडली.
तसेच, आझाद मैदान परिसरात आंदोलनकर्त्या मराठा समाज बांधवांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलन करणे हा लोकशाहीतील एक मूलभूत अधिकार आहे, याची जाणीव करून दिली. त्याबाबतचे निवेदनही सादर केले. या बैठकीला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, दादा भुसे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे उपस्थित होते.