नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (२४ मे) जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नागरी भागांना भेट दिली. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराचा फटका सातत्याने या परिसराला बसतो. त्यात मोठी वित्त आणि जीवितहानीही होते. (Rahul visits poonch)
या गोळीबारात आपले नातेवाईक गमावलेल्या रहिवाशांची आणि कुटुंबांची भेट घेतली. त्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर मांडण्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिले.
‘‘ही एक मोठी दुर्घटना होती. यात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. मोठे नुकसान झाले आहे. मी संबंधित लोकांशी बोललो आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर मांडण्याची विनंती केली आहे आणि मी तो मांडणार आहे,’’ असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. (Rahul visits poonch)
वारंवार होणाऱ्या संघर्षातही पूंछमधील लोकांनी मोठे धैर्य दाखवले आहे, त्याचा सामना ते ताकदीनिशी करतात, असे ते म्हणाले.
‘‘पाकिस्तानच्या गोळीबारात जीव गमावलेल्या पूंछमधील कुटुंबीयांना मी आज भेटलो. उद्ध्वस्त घरे, विखुरलेले सामान, ओले डोळे आणि प्रत्येक कोपऱ्यात प्रियजनांना गमावण्याच्या वेदनादायक कहाण्या असे वेदनादायी चित्र होते. ही देशभक्त कुटुंबे प्रत्येक वेळी धैर्याने आणि सन्मानाने युद्धाचा सर्वांत मोठा भार सहन करतात. त्यांच्या धाडसाला सलाम. मी पीडित कुटुंबांसोबत खंबीरपणे उभा आहे. – मी त्यांच्या मागण्या आणि मुद्दे राष्ट्रीय पातळीवर नक्कीच मांडेन,’’ असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. (Rahul visits poonch)
तत्पूर्वी राहुल गांधी यांनी पूंछमधीलच एका शाळेला भेट दिली आणि गोळीबारामुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना प्रोत्साहन देत गांधी म्हणाले, ‘‘आता तुम्ही धोका आणि थोडीशी भयावह परिस्थिती पाहिली आहे, पण काळजी करू नका, सर्वकाही सामान्य होईल. या समस्येला सामना करण्यासाठी भरपूर अभ्यास करा, खूप मेहनत घ्या आणि शाळेत भरपूर मित्र मिळवा.’’ बाधित कुटुंबांशी भेटी घेतल्यानंतर, गांधींनी पूंछमधील गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभेलाही भेट दिली. या गुरुद्वाराचेही पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नुकसान झाले आहे.