नवी दिल्ली : ओडिशातील विद्यार्थिनीने केलेली आत्महत्या ही “व्यवस्थेने संघटित केलेली हत्या” आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul alleges Odisha Govt)
प्राध्यापकाकडून लैंगिक शोषणाविरुद्ध तक्रार केल्याबद्दल तिला छळ आणि धमकीचा सामना करावा लागला. त्यातून या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले. त्यात सोमवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल राज्य सरकारने दाखवलेल्या दिरंगाईचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी तीव्र निषेध केला आणि ती “व्यवस्थेने संघटित केलेली हत्या” असे म्हटले आहे. (Rahul alleges Odisha Govt)
ओडिशातील बालासोर येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून छळ सुरू होता. तिने वारंवार तक्रारही केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर तिने कॉलेज कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवून घेतले होते. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.
प्राध्यापकाने तिला धमकावले होते आणि शारीरिक हल्ला केला होता आणि कॉलेज प्रशासनाने तिच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत, अशी तक्रार या विद्यार्थिनीने केली होती.
“ओडिशातील न्यायासाठी लढणाऱ्या या मुलीचा मृत्यू हा भाजपच्या व्यवस्थेने केलेला खून आहे. धाडसी विद्यार्थिनीने लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला, परंतु न्यायाऐवजी तिला धमक्या देण्यात आल्या, छळण्यात आले आणि वारंवार अपमानित करण्यात आले. ज्यांनी तिचे रक्षण करायचे होते त्यांनीच तिचा खून केला. भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना संरक्षण दिले आणि एका निष्पाप मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडले,” असा आरोप राहुल गांधी यांनी निवेदनात केला आहे.
दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आरोपी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणातील सर्व दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल, असा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला.