मुंबई : मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील पाच दोषींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (२१ जुलै) नकार दिला. विशेष मकोका ट्रायल कोर्टाने सप्टेंबर २०१५ मध्ये दोषी ठरवलेल्या सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ११ जुलै २००६ रोजी घडवलेल्या या बॉम्बस्फोटांनी अख्खा देश हादरून गेला होता. (Mumbai train blast case)
दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी कोणतेही पुरावे न मिळाल्याने विशेष मकोका कोर्टाचा ३० सप्टेंबर २०१५ चा निकाल रद्द करण्यात येत असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्व आरोपींविरुद्ध खटला सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Mumbai train blast case)
या स्फोटासाठी कोणत्या प्रकारचे स्फोटक वापरले गेले हे सांगण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला. त्यांच्या कबुलीजबाबाच्या वैधतेची चाचणी घेण्यात अपयशी ठरला. बचाव पक्षाचे कथित कबुलीजबाबांपूर्वी छळ झाल्याचे युक्तिवाद न्यायालयाने मान्य केले. योग्य अधिकाराअभावी ओळख परेड तसेच खटल्यादरम्यान घेण्यात आलेली साक्षीदारांची साक्ष विश्वासार्ह सिद्ध झाली नसल्याने रद्द करण्यात आली.
कोर्टाचा हा निकाल ६७१ पानांचा आहे. तो नंतर उपलब्ध करून दिला जाईल. (Mumbai train blast case)
“गुन्ह्याच्या खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा देणे हे गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी, कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक ठोस आणि आवश्यक पाऊल आहे. परंतु या प्रकरणात आरोपींना शिक्षा देण्यासाठी, खोटा देखावा निर्माण केला,’’ या विधानाने उच्च न्यायालयाने आपल्या ६७१ पानांच्या निकालाची सुरुवात केली.
‘‘हे फसवे निष्कर्ष जनतेच्या विश्वासाला तडा देतात. समाजापुढे खोटे काहीतरी आणतात, हे धोकादायक आहे. मूलतः, हा खटला हेच दर्शवितो,” असे मत न्यायालयाने नोंदवले.
या खटल्यात ट्रायल कोर्टाने सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (Mumbai train blast case) या वर्षी ३१ जानेवारी रोजी, अपील आणि अन्य महत्त्वाच्या संदर्भांवर जवळजवळ सात महिने सुनावणी केल्यानंतर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि एस.सी. चांडक यांच्या विशेष हायकोर्ट खंडपीठाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. तो सोमवारी जाहीर करताना विशेष ट्रायल कोर्टाने पाच जणांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द केली.