पुणे : इंद्रायणी नदीवरील अरूंद पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक बुडाल्याची भीती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १० ते १५ जण वाहून गेले आहेत. आपत्कालीन मदत म्हणून बचाव बोटी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. (Bridge collapsed)
पिंपरी-चिंचवड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनहोटे यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) घटनास्थळी पोहोचले आहे. बचाव कार्य सुरू केले आहे. त्यांनी आतापर्यंत ३८ लोकांना वाचवले आहे.
“ सुटी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. पर्यटक पुलावर असतानाच पूल कोसळला. एनडीआरएफ घटनास्थळी आहे,” असे बनहोटे यांनी सांगितले. (Bridge collapsed)
अत्यंत अरुंद पूल
हा पूल अत्यंत अरूंद आहे. एका वेळी फक्त एकच दुचाकी पुलावरून जाऊ शकते. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार होते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाढले की या पुलावरून जाणे अत्यंत धोकादायक ठरायचे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला तरी अन्य पर्याय नसल्याने त्यांना धोका पत्करावा लागत होता. (Bridge collapsed)
रात्री उशीरापर्यंत दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटनेच्या कारणांची चौकशी
पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.(Bridge collapsed)
दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तत्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.
खा. सुळे यांनी दिला धीर
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार दिला. “या ठिकाणी किती पर्यटक होते, कोणते लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधा, त्यांना तातडीने मदत पोहोचवा,” असे निर्देश सुळे यांनी प्रशासनाला दिले.
Tag: