मुंबई : विशेष प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा द्यावा, निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (११ सप्टेंबर) अधिकाऱ्यांना दिले. (Ajit Pawar appeal)
पवार यांनी यावेळी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा घेतला.
मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झालेल्या आढावा बैठकीला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नियोजन विभागाचे सहसचिव विवेक गायकवाड यांच्यासह दूरदृश्य प्रणालीव्दारे सहकार आयुक्त दीपक तावरे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे, महाराष्ट्र बँकेचे महाव्यवस्थापक अरुण कबाडे, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील उपस्थित होते. (Ajit Pawar appeal)
यावेळी अजित पवार म्हणाले, या महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुरक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. या योजनांची माहिती गरजूंपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. (Ajit Pawar appeal)
या योजनांच्या लाभाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड करून त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. सारथी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, संशोधन, स्वाधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती योजना व वसतिगृह यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.