पनवेल : प्रतिनिधी : दशपिंडीचा विधी सुरू होता. भटजी मंत्री म्हणत होते. होमात आहुती दिली जात होती. होमातील धुराने झाडावरील मधाचे पोळे उठले. मधमाश्यांनी पाहुण्यांवर हल्ला चढवला. पळापळ सुरू झाली. भटजीने तर चक्क नदीत उडी मारली. त्यांचा वीस मिनिटे नदीत मुक्काम होता. तिळसेश्वर येथे दशपिंड विधी सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्याचा भयंकर प्रकार घडला. ही घटना सोमवारी (१७ फेब्रुवारी) सकाळी घडली. मधमाश्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांनी सैरावैरा पळ काढला. भटजींनी तर नदीत डुबकी मारली. तरीही पाण्यावर मधमाश्या घोंगावत होत्या. त्यामुळे भटजींनी वीस मिनिटे पाण्यातच मुक्काम ठोकला.
भावेघर येथील एका मृताचा तिळसेश्वर येथे दशपिंड विधी सुरू होता. या विधीसाठी अंदाजे शंभर नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित होते. विधीसाठी होम करण्यात आला होता. या होमाच्या धुरामुळे शंकराच्या मंदिराशेजारी असलेल्या झाडावरील मधमाश्यांचे पोळे उठले. त्यांनी नातेवाईकांवर हल्ला केला. यात सुमारे २० ते २५ जण जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरगुंडी उडालेले नातेवाईक वाट सापडेल तिकडे धावत सुटले. विधी करणाऱ्या भटजीने थेट नदीच्या पाण्यात उडी घेतली. त्यांच्या डोक्यावरही मधमाश्या घोंघावत होता. पाण्यात पोहत, डुबकी मारत त्यांनी आपला बचाव केला. माशा चावल्याने भटजी आणि नातेवाईकांनी खासगी दवाखाना गाठला. प्राथमिक उपचार करुन भटजी पुन्हा घाटावर आले, दशक्रिया विधी पार पाडला. मधमाश्यांनी हल्लाबोल केल्याने पिंडाला कावळा शिवला की नाही, याकडे नातेवाईकांचे लक्ष नव्हते.