- प्रियदर्शन
धर्मेंद्र यांच्या गाजलेल्या चित्रपटाच्या दृश्यांमध्ये ‘शोले’मधील एक दृश्य नक्कीच आठवते—ज्यात ते पाण्याच्या टाकीवर चढलेले असतात. दृश्याच्या शेवटी ते म्हणतात—“गाववालों, मरना कैंसिल!” (Dharmendra Passes Away)
आयुष्यातही धर्मेंद्र जणू आपले ‘मरण’ वारंवार ‘कॅन्सल’ करत आले. मृत्यू अनेकदा त्यांच्या दाराशी येऊन मागे फिरला. अनेकदा ते इस्पितळात गेले, पण पुन्हा बरे होऊन घरी आले. याच महिन्यात त्यांच्या निधनाच्या अफवा जोरात पसरल्या होत्या. पण त्यांचा श्वास थांबला नव्हता. पुन्हा एकदा त्यांनी मरण कॅन्सल केले. अखेर सोमवारी त्या श्वासांनी साथ सोडली.
मृत्यू हा नेहमीच दुःखाचा विषय असतो; पण धर्मेंद्र परिपूर्ण, भरभरून आयुष्य जगले. त्यांच्या जगण्याकडं बघितलं की वाटतं, ते आयुष्य अगदी समरसून आणि मनसोक्त जगले. (Dharmendra Passes Away)
आजोबांपासून नातवापर्यंत
धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास लांब पल्ल्याचा होता. एकाच वेळी ते आजोबांच्या आणि नातवाच्या पिढीतही नायक म्हणून झळकले. या काळात त्यांनी अनेक हिट चित्रपटांची रांग लावली. अनेक पिढ्यांना वेड लावले. त्या बाबतीत त्यांची बरोबरी करणारा दुसरा कुणीही नाही. (Dharmendra Passes Away)
वेगवेगळ्या काळात वेगवेगळे सुपरस्टार आले. कधी राजेश खन्ना, तर कधी अमिताभ बच्चन. पण धर्मेंद्र या दोघांशीही स्पर्धा करताना दिसले.
धर्मेंद्र यांचा पहिला चित्रपट कोणता?
धर्मेंद्र यांचा प्रवास मात्र सोपा नव्हता. जेव्हा ते आले, त्यावेळी दिलीप कुमार–देव आनंद–राज कपूर ही त्रिमूर्ती आपल्या शिखरावर होती. १९६० मध्ये धर्मेंद्र यांचा पहिला चित्रपट आला— ‘दिल भी तेरा हम भी तेरे’.
याच वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ‘मुगल-ए-आझम’ प्रदर्शित झाला. पुढच्या वर्षी ‘गंगा’ नावाच्या दोन चित्रपटांनी धुमाकूळ घातला—राज कपूर यांचा ‘जिस देश में गंगा बहती है’ आणि दिलीप कुमार यांचा ‘गंगा जमुना’. चार वर्षांनी देव आनंद यांचा ‘गाईड’ आला. त्यादरम्यान शम्मी कपूरचा ‘तुम सा नहीं देखा’, ‘जंगली’ आणि राजेंद्र कुमार यांचा ‘जुबिली’ काळ सुरू होता. (Dharmendra Passes Away)
या सर्व चित्रपटांची आठवण आठवण करून देण्यामागचे कारण म्हणजे—इतक्या मोठ्या, प्रभावी काळात धर्मेंद्र यांनी स्वतःला टिकवून ठेवले.
दिलीप–देव–राज कपूर युग ओसरले. शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार मावळले. नंतर राजेश खन्ना धूमकेतूसारखे चमकले. अमिताभ बच्चन शहंशाह म्हणून उभे राहिले. मग शाहरुख–आमिर–सलमान यांचे सुपरस्टार युग आले— पण धर्मेंद्र यांचा जलवा कायम होता.
त्यांच्या अनेक चित्रपटांची नावे तर जणू त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून किंवा त्यांच्या भूमिकांवरूनच ठेवली गेली होती. अगदी हृतिक रोशन–रणबीर कपूर येईपर्यंतही धर्मेंद्र ‘जॉनी गद्दार’सारख्या चित्रपटांमध्ये रंगतदार कामगिरी करत राहिले. आणि याच डिसेंबरमध्ये त्यांचा ‘इक्कीस’ नावाचा नवा चित्रपट येणार आहे. ज्याचे पोस्टर आजच प्रसिद्ध झाले.
अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या इनिंगचा अपवाद. नाहीतर सात दशकांची अशी अखंड कारकीर्द दुसरी दिसत नाही. (Dharmendra Passes Away)
सुंदर, सोज्वळ आणि देखणा नायक
धर्मेंद्र यांचा सर्वोत्तम काळ १९७०-८० चा होता. ते देखणे, सडपातळ आणि आकर्षक युवक होते. देव आनंद आणि दिलीप कुमार यांसारखे अभिनेतेही त्यांचा हेवा करत असत, असे म्हटले जाते.
पण सामान्य प्रेक्षकांमध्ये धर्मेंद्र एवढे लोकप्रिय का झाले?
ते दिवस होते, भारतातल्या छोट्या शहरांचे, गावांचे. जिथे साहस, नैतिकता आणि शौर्य यांना वेगळी किंमत होती. धर्मेंद्र यांची प्रतिमा याच गुणांनी भरलेली होती.
त्यांना इंग्रजी माध्यमाने ‘ही-मॅन’ ही उपाधी दिली. हिंदी प्रेक्षकांना त्याचा नेमका अर्थ तेव्हाच नव्हे, तर आजही माहीत नसावा. पण धर्मेंद्र हे वेगळेच रसायन होते. ते रोमान्सही करायचे. मारामारीही करायचे. कॉमेडीही करायचे. रागही दाखवायचे, मैत्रीही करायचे आणि वैरही. कधी गुप्तहेर बनायचे तर कधी गुन्हेगार. (Dharmendra Passes Away)
शराफत आणि लोफर
त्यांना कधी भारतातील श्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये गणले गेले नाही. पण त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. त्यांचा चेहरा `शराफती`पासून `शरारती`पर्यंत सहज बदलत असे. योगायोग नव्हे की त्यांचा एक चित्रपट ‘शराफत’ होता तर दुसरा ‘लोफर’. ते शहजादा बनू शकत होते आणि गुलामही. ‘धर्मवीर’मधील त्यांचा राजेशाही थाट एकीकडे होता तर ‘रजिया सुल्तान’मधील गुलामाची भूमिका दुसरीकडे.
असे म्हणतात की या चित्रपटात त्यांच्या चेहऱ्यावर लावलेला गडद काळा रंग हा कमाल अमरोही यांनी घेतलेला बदला होता. मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या जवळीकीबद्दलच्या चर्चांमुळे घेतलेला बदला. आणि त्या काळ्या रंगानेच त्या चित्रपटाचे सौंदर्य बिघडले. हा एकमेव चित्रपट असेल, ज्यात धर्मेंद्र त्यांचा सहज–स्वाभाविक लुक सोडून दिसतात.
अन्यथा ते अत्यंत सहज अभिनय करणारे कलाकार होते. डोळ्यांत, चेहऱ्यावर भावना सहज उमटणारे. संवादफेक उत्तम. प्राध्यापक म्हणून वेगळी हिंदी, गुंड म्हणून वेगळी.
अमिताभ बच्चन त्यांच्या उत्तम हिंदीसाठी प्रसिद्ध होते. पण त्या पिढीतील अनेक कलाकारांची हिंदी उत्कृष्ट असे. पंजाबच्या एका गावातून आलेल्या धर्मेंद्र यांनी यासाठी फार मेहनत घेतली असणार.
कुटुंबाने निधनाची घोषणा का केली नाही?
धर्मेंद्र यांचा शेवटचा काळ मात्र एका हृदयद्रावक चित्रपटासारखा राहिला. ज्या समृद्ध आयुष्याचा त्यांनी दीर्घकाळ आनंद घेतला, त्यात अखेरच्या दिवसांत त्यांच्या वाट्याला एकटेपणाच आला. आपल्या फार्महाऊसमध्ये ते बरीच वर्षे एकटेच राहिल्याचे सांगितले जाते. अलीकडे जेव्हा त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली, तेव्हा कुटुंबाने ती फेटाळली. पण आज, जेव्हा त्यांनी निधनाची अधिकृत घोषणा करायला हवी होती, तेव्हा माध्यमांना तर्क लावण्यासाठीच सोडण्यात आले. (Dharmendra Passes Away)
सकाळी त्यांच्या घराबाहेर कुटुंबीय येऊ लागल्याच्या बातम्या आल्या. मग माध्यमे सजग झाली. स्मशानात कुटुंबीय पोहोचले. चित्रपट कलाकार पोहोचले. पण कुटुंबीयांनी मृत्यूची घोषणा करण्याची तसदी घेतली नाही. माध्यमांना आणि चाहत्यांना धर्मेंद्र आपल्यात नाहीत, हे अंदाजानेच समजून घ्यावे लागले.
धर्मेंद्रसारख्या महान कलाकाराची अंतिम यात्रा अशा प्रकारे योग्य होती का? ज्यांनी त्यांना आयुष्यभर प्रेम दिले, ज्या चाहत्यांनी त्यांना धर्मेंद्र ‘बनवले’—त्यांना त्यांच्या अंतिम दर्शनाची संधी मिळायला नको होती का? (Dharmendra Passes Away)
सात दशकं चमकलेला हा तारा जणू शांतपणे आकाशातून गायब झाला.
एक युग संपले… पण त्यांची युगप्रभा कायम आहे.
खरेतर धर्मेंद्र यांच्या युगाचा अंत आधीच झालेला होता.
पण त्यांच्या निधनामुळे पुन्हा जाणीव होते, की एक संपूर्ण युग त्यांचेही होते.
आणि जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल—
धर्मेंद्र हे नाव पहिल्या रांगेत सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
(लेखक एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत.)