नवी दिल्ली : भारतीय संविधानाची प्रस्तावना बदलता येत नाही, पण आणीबाणीच्या काळात ती बदलली गेली, असा दावा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शनिवारी (२८ जून) केला. (V-P Dhankhar)
संविधानाची प्रस्तावना हे ‘मूळ’ आहे. त्यावर संविधानाचा संपूर्ण डोलारा उभा आहे. त्यांनी सांगितले की भारत वगळता इतर कोणत्याही संविधानाच्या प्रस्तावनेत बदल झालेला नाही, पण १९७६ च्या ४२ व्या संविधान (दुरुस्ती) कायद्याने ही प्रस्तावना बदलण्यात आली. त्यामध्ये ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’ हे शब्द समाविष्ट करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.
आपण या विषयावर चिंतन केले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, डॉ. बी. आर. आंबेडकरांनी संविधानावर कठोर परिश्रम घेतले आणि त्यांनी त्यावर (प्रस्तावनेवर) निश्चितच लक्ष केंद्रित केले असावे. (V-P Dhankhar)
उपराष्ट्रपती धनकड येथे आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. गुरुवारी संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द आणीबाणीच्या काळात समाविष्ट केले होते. आंबेडकरांनी लिहिलेल्या मूळ संविधानाचा ते भाग नव्हते, असा दावा केला होता. तसेच त्याचे पुनरावलोकन करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर धनकड यांनी केलेल्या विधानाला महत्त्व आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी होसबाळे यांच्या विधानावर टीका केली आहे. संघाचा हा ‘राजकीय संधीसाधूपणा’ आहे. संविधानाच्या आत्म्यावर ‘जाणीवपूर्वक केलेला हा हल्ला’ असल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे.
दुसरीकडे आरएसएसशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ या मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात होसबाळे यांच्या विधानाचे समर्थन करण्यात आले आहे. संविधानाचा मूळ गाभा जसाच्या तसा अमलात आणण्यासाठीचे हे पाऊल आहे. काँग्रेसच्या आणीबाणीच्या काळातील धोरणांच्या ‘विकृतीं’पासून हा विचार मुक्त आहे. (V-P Dhankhar) केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दत्तात्रय होसबाळे यांच्या आवाहनाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. कोणताही योग्य विचार करणारा नागरिक त्यांच्या भूमिकेचे समर्थन करेल. कारण सर्वांना माहित आहे की, हे शब्द (‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’) डॉ. बी.आर. आंबेडकरांनी लिहिलेल्या मूळ संविधानाचा भाग नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
संघाचा बुरखा उतरला; त्यांना मनुस्मृती हवी आहे : राहुल गांधी
होसबाळेंचे वक्तव्य लोकशाहीवरील हल्ला : लालू प्रसाद