नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सर्व मर्यादा ओलांडत आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सोमवारी (२१ जुलै) नोंदवले. (SC slams ED)
ईडीविरूद्ध आधीच मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात येत आहेत. त्याला चालना देणारे कोणतेही “सामान्य” निरीक्षण करू नये, असे आवाहन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला केले असतानाच न्या. गवई यांनी हे निरीक्षण नोंदवले.
अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल या दोन वरिष्ठ वकिलांना व्यावसायिक सल्ला दिल्याबद्दल ईडीने समन्स बजावले आह. याची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत सु – मोटो दाखल करून घेतलेल्या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांचा समावेश असलेल्या खंडपीठ आणि सॉलिसिटर जनरल मेहता यांच्यात शाब्दिक चकमक झाली. (SC slams ED)
‘‘आपण जे केले ते निश्चितच चुकीचे आहे याची जाणीव ईडीला झाली आहे,’’ असे अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी सौम्य स्वरात सांगितले. तसेच दोघा वकिलांना बजावलेले समन्स नंतर मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या सुनावणीदरम्यान, ‘‘तुमचे अधिकारी सर्व मर्यादा ओलांडत आहेत,’’ असे मुख्य न्यायाधीश गवई यांनी श्री. वेंकटरमणी यांना उद्देशून म्हटले. (SC slams ED)
त्यावर मेहता यांनी हस्तक्षेप करत, जरी या प्रकरणात दोन्ही वकिलांना समन्स बजावायला नको होते, तरी न्यायालयाकडून अशा निरीक्षणांचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची आणि एक संस्था म्हणून ईडीविरुद्ध वापर होण्याची शक्यता आहे, असे न्यायालयाला सांगितले.
‘‘असे असले तरी ईडी अनेक प्रकरणांमध्ये मर्यादा ओलांडत आहे असे आम्हाला आढळले आहे, असे उत्तर सीजेआयने मेहता यांना दिले.
सॉलिसिटर जनरल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय सुनावणीसाठी केस घेण्यापूर्वीच ईडीविरूद्ध कथा रचल्या जातात. ‘‘उदाहरणार्थ, मी ३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असलेला राजकारणी आहे. अशावेळी मी अनेक मुलाखतींद्वारे [ईडीबद्दल] खोटे कथानक तयार करू शकतो,’’ असे मेहता यांनी स्पष्ट केले. (SC slams ED)
त्यावर, न्यायालयाला ईडीच्या प्रकरणांमध्ये राजकीय प्रभाव असलेल्या जमिनीवरील वास्तवाची जाणीव आहे, असे स्पष्ट शब्दांत मुख्य न्यायाधीशांनी सूचित केले. ‘‘अशी काही प्रकरणे आहेत ज्यात उच्च न्यायालयाने योग्य आदेश दिल्यानंतरही ईडी अपील दाखल करते. हे केवळ अपील दाखल करण्यासाठी केले जाते,’’ असे मुख्य न्यायाधीश गवई यांनी निदर्शनास आणून दिले.
मेहता यांनी उत्तर दिले की, ‘‘या जमिनीवरील वास्तवांना नंतर प्रकरणातील तथ्ये आणि पुराव्यांवरून दाखवावे लागते. व्यापक निरीक्षणे चुकीचा संदेश देतात.’’
न्यायमूर्ती चंद्रन यांनी मेहता यांना या “कथा” न्यायालयावर कसा प्रभाव पाडतात हे सांगू शकता का, असा प्रश्न केला.
“जर आपल्याला त्या अजिबात दिसत नसतील तर या कथनांचा आपल्यावर कसा प्रभाव पडेल असे तुम्हाला वाटते? कथा होत राहतील, परंतु त्यांचा प्रभाव पडेल असे तुम्ही गृहीत धरू शकत नाही,” न्यायाधीशांनी श्री. मेहता यांना सांगितले.
न्यायालयाने बाह्य प्रभावाच्या आधारे न्यायालयीन निर्णय दिला होता अशा घटनेचा पुरावा सादर करण्यास मुख्य न्यायाधीशांनी श्री. मेहता यांना सांगितले.
त्यानंतर मेहता यांची भाषा सौम्य झाली.