कोल्हापूर : प्रतिनिधी : शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेता, यापुढे जर नवे रस्ते खराब झाले तर संबंधित उपशहर अभियंता जबाबदार राहतील, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.
सर्किट हाऊस येथे आज आयोजित बैठकीत त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह शहरातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंते महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पवार, प्रोजेक्टचे सुरेश पाटील संबंधित ठेकेदार व कन्सल्टंट उपस्थित होते. (MLA Kshirsagar)
आमदार क्षीरसागर यांनी दोषदायित्व कालावधीत व नवीन करण्यात येत असलेल्या रस्त्यांचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ठेकेदारांनी कामे तातडीने व वेळेत न पूर्ण केल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांचे मोजमाप, जाडी व गुणवत्ता तपासण्याची थेट जबाबदारी उपशहर अभियंत्यांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पर्यटक व नागरिकांना सतत खराब रस्त्यांचा सामना करावा लागत असून, दिवाळीपूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश आमदार क्षीरसागर यांनी शहर अभियंत्यांना दिले. भूसंपादन किंवा इतर अडचणी असलेल्या रस्त्यांच्या बाबतीत नगररचना विभागाशी समन्वय साधून तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता योग्य नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. (MLA Kshirsagar)
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सर्व ठेकेदारांना नोटिसा बजावल्याचे सांगत, पावसाचा जोर कमी होताच दोन-तीन दिवसांत युद्धपातळीवर कामे सुरू करून दिवाळीपूर्वी सर्व रस्ते चांगले व दर्जेदार करण्याचे नियोजन केलेचे त्यांनी सांगितले. या बैठकीला नगरोत्थान योजनेचे ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रा प्रा. लि. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अन्सार मुल्ला व कन्सल्टंट संदीप गुरव उपस्थित होते. (MLA Kshirsagar)
Tag: