मुंबई : विशेष प्रतिनिधी : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी बुधवारी (३० जुलै) आपले दोन्ही पुत्र आणि कार्यकर्त्यांसह सुमारे २३ वर्षांनी भारतीय जनता पार्टीत पुन्हा घरवापसी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत डांगे यांनी पुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचेही भाजपात प्रवेश करण्यात आले. यावेळी डांगे यांनी महत्त्वाचे विधानही केले आहे. (Dange rejoin BJP)
विशेष म्हणजे आरएसएसच्या मुशीत तयार झालेले आणि शिवसेना-भाजप युतीमध्ये मंत्री राहिलेल्या अण्णासाहेब डांगे हे 23 वर्षांनी स्वगृही परतल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये असताना दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या शिफारसीवरुन त्यांना मंत्रीपद मिळाले होते. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी डांगे यांच्या जुन्या काळातील राजकीय आठवणींना उजाळा दिला.
अण्णासाहेब डांगे यांनी यापूर्वी राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात युतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतरच्या काळात महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी घड्याळ हाती बांधलं होते. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आता ते पुन्हा भाजपात परतले. (Dange rejoin BJP)
यावेळी अण्णा डांगे म्हणाले,’आजचा दिवस माझ्या भाग्याचा दिवस आहे, २० मार्च २००२ ला मी पक्षाचा राजीनामा दिला होता. आज पुन्हा घरी परतत आहे.आता जे हयात नाहीत. त्यांचच्याबद्दल बरे वाईट बोलणं बरोबर नाही. पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. अटलजींनी नाव घेतले प्रमोद महाजन यांचे उत्तराधिकारी होतील आणि गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करायचं होते, म्हणून माझ्यावर अन्याय झाल्याची भावना यावेळी अण्णासाहेब डांगे यांनी बोलून दाखवली. तिथून माझी पिळवणूक चालू झाली, गोपीनाथ मुंडे आणि मी खूप जवळचे मित्र. पण, नाईलाजाने मला पक्ष सोडायला लागला. शरद पवार एकदा एका व्यक्तीला बोलले होते की, अण्णांसोबत माणसं आता राहिली नाहीत. या वाक्यामुळे मी पक्षातून निष्क्रिय झालो, असेही डांगेंनी यावेळी सांगितले. (Dange rejoin BJP)
चिमण डांगे म्हणाले, मुख्यमंत्री आणि आपल्या वडिलांनी देखील एकत्र काम केले आहे, आमच्याकडून कधीही पक्षाशी गद्दारी होणार नाही हे आश्वासन आम्ही देतो. माझी एकच मागणी आहे, उरुण ईश्वरपूर असं नाव कृपया करा.
दरम्यान, डांगे कुटुंबाच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील म्हणाले,’ माणसे फुटत असतील तर ते माणसे फोडणारच, ज्यांना जायचे ते जातील आणि ज्यांना माझ्याबरोबर थांबायचे ते थांबतील.
महापौर असताना अण्णांसोबत काम केलं : फडणवीस
आमच्या सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे, अण्णांनी पक्ष वाढवण्यासाठी मोठं काम केलं, त्यांचा मोठा वाटा या सगळ्यामध्ये आहे. आम्ही लहान कार्यकर्ते असल्यापासून प्रमोदजी, गोपीनाथजी अण्णा या सगळ्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठा केलं आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं. गोपीनाथजीही अण्णांबरोबर चर्चा करून मग निर्णय घ्यायचे. ‘माझी संघ जीवन गाथा,’ हे पुस्तक अण्णांनी लिहिलं, प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो, अशीही आठवण फडणवीसांनी सांगितली.