नवी दिल्ली : भारताने सहाव्यांदा १९ वयोगट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे आव्हान ठेवले होते. वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत तब्बल प्रत्येकी १५ चौकार, आणि षटकार ठोकत १७५ धावांची तुफानी खेळी केली. इंग्लंडला भारताचे आव्हान पेलवताना १०० धावा कमी पडल्या. त्यांचा डाव ३११ धावांत संपुष्टात आला. कॅलेब फॉल्कनरने धडाकेबाज खेळी करताना ६७ चेंडूत ११५ धावा चोपत इंग्लंडचे आव्हान जिंवत ठेवले होते. पण तो बाद झाल्यानंतर भारताने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. (India won the Cricket World Cup for the sixth time)
झिंब्बावेची राजधानी हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर अरॉन जार्ज ९ धावावर बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हेत्रे यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी इंग्लंडची गोलंदाजी चोपून काढली. दुसऱ्या गडासाठी दोघांनी १४२ धावांची भागिदारी केली. कर्णधार म्हात्रेने चार चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ५३ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याने ८० चेंडूत १७५ धावा चोपल्या. त्याने १५ चौकार आणि १५ षटकार ठोकले. चौकार आणि षटकार ठोकत त्याने १५० धावा चोपल्या. २५ धावा पळून काढल्या. त्याचा स्टाईक रेट २१८.१५ इतका होता. त्यानंतर वेंदात त्रिवेदीने ३२, विहान मल्होत्राने ३०, अभ्यांग कुंडुने ४० धावा केल्या. कंशिक चौहानने २० चेंडूत ३७ धावा केल्या. भारताने ५० षटकात ९ बाद ४११ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून जेम्स मेंटोने ३, सेबिस्टन मॉर्गन, अलेक्स ग्रीनने प्रत्येकी २ तर मॅनी लम्सडेनने १ बळी मिळवला. (India won the Cricket World Cup for the sixth time)
भारताचे ४१२ धावांचे आव्हान स्वीकारात इंग्लंडची सलामीची जोडी मैदानात आली. जो मूरेसला अंबरिशने क्लीन बोल्ड केले. बेन मायेस आणि बेन डॅकविन्सने फटकेबाजी केली. मायेसने २८ चेंडूत ४५ तर सलामीवर डॅकविन्सने ६६ धावांची खेळी केली. कर्णधार थॉमस रिवने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडला सलग तीन धक्के बसले. रॅलफिन अल्बर्ट शून्य धावावर धावबाद झाला. फरहान अहमदने १ तर सॅबिस्टन मॉर्गनला भोपळाही फोडता आला नाही. तर दुसरीकडे कॅलेब फॉल्कनरने फटकेबाजी करत इंग्लंडचे आव्हान जिंवत ठेवले होते. त्याला जिम्स मिंटोने साथ दिली. मिंटोने ४१ चेंडूत २८ धावा केल्या. फॉल्कनरची वेगवान खेळी कंशिक चौहानने संपुष्टात आणली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फॉल्कनरने ६७ चेंडूत ११५ धावा चोपल्या. नऊ चौकार आणि सात षटकार ठोकले. भारताच्या आर.एस. अंबरिशने ३ गडी बाद केले. डी.दीपेश, कंशिक चौहानने प्रत्येकी दोन, खिलान पटेल आणि आयुष म्हेत्रेने प्रत्येकी एक गडी बाद केला. (India won the Cricket World Cup for the sixth time)