कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात राज्य सरकारची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (March in Sangali)
अलमट्टी प्रश्नांवर शासकीय विश्रामगृहात बैठक झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अरुण लाड, व्ही.बी.पाटील, विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील म्हणाले, सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने मे महिन्यात अलमट्टी प्रश्नांवर रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यशासनाने बैठक घेतली. पण बैठक घेताना राज्य सरकारने फक्त सत्ताधारी आमदारांना बैठकीसाठी बोलावले पण आंदोलनात सहभागी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना बोलावले नाही. महाविकास आघाडीने अल्लमट्टी प्रश्नी राज्य सरकार काय करणार आहे अशी विचारणा केली होती. त्यानंतरही सरकारने काही केलेले नाही. या प्रश्नांवर सरकार गंभीर दिसत नाही. हिप्परगी आणि अलमट्टी धरणावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून अहवाल संघर्ष समितीला मिळालेला नाही. वडनेर समितीचा अहवाल स्वीकारला की नाही हे सांगत नाही. सरकारकडून कोणत्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने १० जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. (March in Sangali)
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर येऊ नये म्हणून हिप्परगी, अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग गतीने झाला पाहिजे. याकडे शासन गांभीर्याने पहात नाही. शासनाला जागे करण्यासाठी रस्तांवरची लढाई तीव्र करावी लागेल. विधानसभा अधिवेशनातही लक्ष वेधावे लागेल. त्यासाठी १० जुलै रोजी होण्याऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. या बैठकीत आमदार लाड, माजी आमदार उल्हास पाटील, कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील उपस्थित होते.