जमीर काझी : मुंबई : अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना बडतर्फ केले. पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात घेतल्याने त्यांचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी अकोटमध्ये एमआयएमबरोबर युती केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालन्यात केली .
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जालना येथे सभा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपा व शिंदेसेनेविरोधात लढला व १२ नगरसेवक निवडून आले पण भाजपाने अंबरनाथ विकास आघाडी करण्यासाठी पक्षाच्या लेटर हेडवर पत्र जारी केले आहे. काँग्रेसने तात्काळ कारवाई केली पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणतीही कारवाई केली नाही, केवळ एक विधान करून ते मोकळे झाले. भाजपाच्या कथनी आणि करणीत फरक आहे. अशी अभद्र युती करताना तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात घेताना भाजपाला लाज वाटायला पाहिजे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला आहे, असा टोला लगावला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे वक्तव्य केले यातून त्यांना सत्तेचा माज आल्याचे दिसते. शिवराज पाटील -चाकूरकर, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे व शंकरराव चव्हाण यांचेही नाव भाजपाला पुसायचे आहे. नांदेडच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यासमोरच नांदेडमध्ये ७० वर्षात काहीही नियोजन केले नाही, विकास केला नाही हे सांगून चव्हाण यांच्या तोडांवरच ते नालायक आहेत हे सांगितले. भाजपाची मानसिकतता ओळखा, त्यांना शिव, शाहु, फुले व आंबेडकर यांचे विचारही पुसायचे आहेत, अशा अहंकारी भाजपाला जनतेने धडा शिकवावा, असेही सपकाळ म्हणाले.
‘त्या ‘१२ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर कारवाई करणार… अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून त्या सर्वांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे. असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अनैतिक तर आहेच पण असंवैधानिकही असल्याचे त्यांनी सांगितले.