प्रयागराज : माघी पौर्णिमेचे औचित्य साधून प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर आला आहे. बुधवारच्या महाकुंभात सव्वा कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाकुंभला येण्यासाठी रेल्वेमधून मोठ्या संख्येने प्रवासी येत आहेत. रेल्वेची वेळापत्रके कोलमोडून गेली आहेत. महाकुंभमेळ्याला यापूर्वी ४५ कोटी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, पण भाविकांचा ओघ पाहता ५० ते ५५ कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाकुंभला होणारी गर्दी लक्षात घेऊन पहाटे चार वाजल्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनौ येथील वॉररुममधून व्हिडिओद्वारे महाकुंभचा आढावा घेत आहेत.( Maghi Paurnima)
माघी पोर्णिमेला होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्तर प्रदेश राज्य सरकारने प्रयाराजमध्ये ‘नो व्हेईकल झोन’ची घोषणा करण्यात आली आहे. शहराच्या बाहेर वाहने थांबवण्यात आली आहेत. गेले तीन दिवस प्रयागराजकडे येणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते. शंभर किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. ज्या ठिकाणी वाहने थांबली आहेत तिथून पायी २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास करुन भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. बुधवारी माघी पोर्णिमेच्या मुहूर्तावर ४४ घाटांवर पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. .( Maghi Paurnima)
प्रयागराजचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मंदार यांनी माघी पौर्णिमा स्नानासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘३२२ हून अधिक अधिकारी, नऊ हजारांहून अधिक सैन्य आणि ६० हून अधिक आरएएफ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसही मोठ्या संख्येने तैनात आहेत. कुंभमेळा विशेष गाड्या आणि इतर गाड्या सुरळीत सुरू आहेत. हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे. मुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या सुचनेनुसार, लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. गेल्या काही दिवसांपासून होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत ४० कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे.’ ( Maghi Paurnima)
भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी ‘एएनआय’शी बोलताना प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघी पौर्णिमा उत्सवाबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, ‘बुधवारी माघी पौर्णिमेसाठी जगभरातून कोट्यवधी लोक संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत. येथील आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, तो येथे आल्यानंतरच अनुभवता येतो.’
हेही वाचा :