- डॉ. विवेक कोरडे
मोठेच गमतीशीर दृश्य होते. फेब्रुवारी महिन्यात मुंबईतल्या नेहरु सेंटरमध्ये संघाच्या शंभरीनिमित्त ‘नए क्षितिज’ हा संघाबद्दलचे ‘समज-गैरसमज दूर करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकशाही आणि संघ, संघ आणि नेहरु आणि अशी प्रतिकात्मकरीत्या संगती-विसंगती तिथे एकत्र नांदताना दिसत होती. संघाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते उद्योगपती-नोकरशहा -सत्ताधारी राजकारणी, मानाचे संपादक, फिल्मी नट-नट्या, दिग्दर्शक, निर्माते अशा सगळ्यांच्या सरबराईत गुंतले होते. त्यातही सलमान खान, रणबीर कपूरसारख्या फिल्मी (आणि काही बदनामही) लोकांसाठीची कार्यकर्त्यांची लगबग विलक्षणच गमतीशीर होती. सरसंघचालक मोहन भागवतांनी उधळलेले विचारधन साठवण्यासाठी आलेला हाच वर्ग काँग्रेसच्या काळात त्यावेळच्या सत्ताधीशांपुढ्यात आपल्या निष्ठा जाहीर करत होता. इथे त्यांना धर्म, देव, जात-पात आणि राष्ट्रावादाचा ‘व्हॅल्यू अॅडेड’ डोस मिळणार होता. जो धार्मिक, जो देवभोळा, जो संघात जाणारा वा संघसमर्थक तो नैतिक अशी मूल्यव्यवस्था रुजल्याच्या या नव-नैतिक काळातला हा म्हटला, तर न्यूनगंड दर्शन सोहळाच होता. त्यातली सरसंघचालकांची वचने/उद्धृते/भाष्य संघाचे खरे रुप झाकणारी होती. (rss centenary celebration)
शंभर वर्षे एकच भाषा
स्वतःला हिंदुत्ववादी सांस्कृतिक संघटन म्हणून घेणाऱ्या राजकीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली. एरवी, एखाद्या संस्था-संघटनेच्या आयुष्यात शंभरी गाठणं हा खरोखरच अभिमानाचा आणि गौरवाचा विषय असतो. त्या अभिमानास आणि गौरवास संघ पात्र ठरला आहे. या प्रदीर्घकाळात संघात छोटे-मोठे मतभेद झाले असतील, छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्या असतील, पण त्या कधीही बाहेर आल्या नाहीत. नाही म्हणायला, गोव्यात कुण्या स्वयंसेवकाने बंडाचा प्रयत्न केला. त्या स्वयंसेवकाचे साधे नाव आज फारसे कुणाच्या आठवणीत नाही. (rss centenary celebration)
शंभर वर्ष जसेच्या तसे टिकून राहणे, तीच एकच एक भाषा बोलत राहणे, हे बुद्धीचे वरदान लाभलेला मानवी समाज म्हणून साधी गोष्ट नाही. एकेकाळी टिंगलीचा विषय असणारी ही संघटना कशामुळे का असेना, आज आपल्या विचारांचे सरकार केंद्रात आणि अनेक राज्यात स्थापन करण्यास यशस्वी झाली आहे. बाकी कशासाठी नाही, तरी निदान यासाठी तरी संघ परिवाराचे अभिनंदन करावयाला हवे.
सातत्य हे विघातक कृतीलाही सहाय्यभूत ठरते, विधायक कृतीलाही. लोकशाहीत विधायक सातत्याची अपेक्षा, आकांक्षा आणि प्रतीक्षा असते. संघाला आज जे लौकिक यश मिळाले आहे, ते विघातक प्रकारातल्या सातत्याने मिळाले आहे. ‘हिंदूंनो संघटित व्हा’, ‘आणि संघटित होण्यासाठी एक व्हा’ या बोलण्यापलीकडे संघाने हिंदू समाजात सामाजिक सुधारण्यासाठी फार असे काही केलेले नाही. संघाच्या आजवरच्या इतिहासात महिला, दलित आणि शोषित वंचित समूहांच्या हक्क आणि अधिकारांसाठी समाज परिवर्तनाची एकही चळवळ वा आंदोलन नोंदले गेलेले नाही.
गोबेल्सचा आदर्श संघाचा आदर्श
संघाला जातिव्यवस्थेची चौकट कायम ठेऊन, धर्मश्रेष्ठत्वाचा गंड बाळगून हा देश आपल्या विचार-वर्चस्वाखाली आणायचा आहे. स्वातंत्र्य आंदोलनापासून दूर राहूनही, आम्हीच खरे राष्ट्रवादी आणि देशप्रेमी ही छद्म प्रतिमा निर्माण करण्यात संघ यशस्वी झाला आहे. असे म्हणण्याचे कारण, संघाच्या राष्ट्रवादात १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेले भारत हे राष्ट्र नाही. भारत या स्वतंत्र राष्ट्राचा राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ हा संघाला आपला (सत्तेपर्यंत पोहोचण्याचा आपद्धर्म म्हणून कालांतराने संघाने तो आपला मानला हा भाग निराळा.) वाटला नाही आणि सर्वांना समान नागरिकत्व देणारे संविधानही संघाने आजही मनापासून स्वीकारलेले नाही. असे असतानाही संघ राष्ट्रप्रेमी संघटना म्हणून मान्यता पावली आहे. गेल्या शंभर वर्षात संघाचे सर्वात मोठे यश मोजायचे तर ते हे आहे.
एकच गोष्ट पुन्हा पुन्हा उच्चरवाने बोलली, मग ती खोटी असली तरी खरी ठरते, हा गोबेल्सचा आदर्श संघाचा आदर्श आहे. ही गोष्ट कधीही लपून राहिलेली नाही. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी मुंबईत जे व्याख्यान दिले त्यातही ही गोष्ट स्पष्टपणे जाणवते. (rss centenary celebration)
अखंड भारताचे दिवास्वप्न
भागवतांनी मुंबईतील व्याख्यानमालेत संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर त्यांनी अखंड भारत, जातविरहित समाज, हिंदू एकता सामाजिक समरसता या संघाच्या नेहमीच्या केवळ बोलायच्या विषयांवर भाष्य केले. या साऱ्या बाबींवर संघ बोलत आला आहे. परंतु असे बोलणे म्हणजे संघाने सार्वजनिक सभेत घेतलेले सोज्वळ रूप असते. संघाला या गोष्टींवर कृती न करता फक्त बोलायचे असते, म्हणूनच यावर लिहिणे भाग आहे.
‘अखंड भारत’ हा संघाचा तर स्थापनेपासूनचा लाडका विषय. त्यावर बोलल्याशिवाय भागवत कसे राहणार? १९४७ला झालेल्या फाळणीचा उल्लेख करत त्यांनी २०४७मध्ये अखंड भारताच्या निर्मितीचे स्वप्न मांडले. फाळणी या देशाचे मोठे दुर्दैव होते. हिंदूंना मुसलमान आपल्यावर राज्य करतील याची भीती वाटत होती. आजही मुस्लिम लोकसंख्यावाढीचा बागुलबुवा उभा करून ‘हिंदू खतरेमे’ म्हणणारे लोक कोणत्या विचाराचे आहेत, हे वेगळे सांगायला नको. हिंदूंना मुसलमानांचे राज्य येईल ही भीती होती, तर मुसलमानांना लोकशाहीत हिंदू बहुसंख्य असल्यामुळे आपल्यावर ‘हिंदुराष्ट्र’ लादले जाईल ही भीती वाटत होती. फाळणी टाळण्यासाठी या दोन समाजांमध्ये परस्परविश्वास आणि भारतीय म्हणून ऐक्याची भावना निर्माण करणे आवश्यक होते. ते करणाऱ्या महात्मा गांधींना विरोध करण्यापलीकडे या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी नेमके काय केले, याचा हिशेब भागवतांनी मांडायला हवा होता,
‘हिंदुस्तान हिंदूओंका, नही किसी के बापका’ म्हणणारे वाचाळवीर अखंड हिंदुस्तान कसा निर्माण करणार होते? द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे कोणती देशसेवा करत होते? त्रावणकोरच्या दिवाणाला सावरकरांनी भारतात विलीन न होण्याचा सल्ला का दिला होता? ‘काश्मीर अॅज अ हिंदू स्टेट शल नॉट मर्ज विथ सेक्युलर इंडिया’ असे म्हणणारा प्रेमसिंग डोग्रा नेमका कोणत्या हिंदुत्ववादी संघटनेचा नेता होता? या प्रश्नांचा ऊहापोह भागवतांनी करायला हवा होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फाळणी होत असताना तथाकथित हिंदुत्ववादी नेते काय करत होते, कुणाबरोबर सत्तेत सहभागी झाले होते, हे देखील भागवतांनी सांगायला हवे होते.
झुलवत ठेवण्याची क्लृप्ती
२०४७ मध्ये अखंड हिंदुस्तान निर्माण करणार म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश यासह आणखीन बरेच देश भारतात येणार. म्हणजेच मुसलमानांची संख्या वाढणार. म्हणजेच हिंदू अधिक ‘खतरेमे’ येणार की नाही, हे देखील भागवतांनी सांगायला हवे. पण भागवत यापैकी काहीच करणार नाहीत. कारण अखंड भारत हे हिंदूंना झुलवण्यासाठी वापरण्याची क्लृप्ती आहे. २०४७ फार लांब नाही. २०४७मध्ये जे सरसंघचालक असतील ते २१४७ साली अखंड भारत करणार असे जाहीर करतील. (rss centenary celebration)
याच भाषणात भागवतांनी जातीव्यवस्था कालबाह्य असून ती मिटवली पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले. या विचारांमागे उदारमतवाद, प्रागतिकता ही मूल्ये आहेत, असे नक्कीच म्हणवत नाही. कारण, ही हाक संघाच्या राजकीय सामर्थ्याला बळ देणारी आहे. संघाला हे पुरते ठाऊक आहे की, समाज जातीपातींमध्ये विभागला की, हिंदुत्वाचे राजकीय कथन कोसळते, ते तोलून धरण्यासाठी भागवत जातीव्यवस्था कालबाह्य ठरवतात. एरवीसुद्धा, भागवतांचा या प्रतिपादनावर जर खरंच विश्वास बसला असता तर फार बरे झाले असते. पण संघाच्या गुरु गोळवलकरांनी आणि आज संघाचे आदर्श असलेल्या सावरकरांनी मनुस्मृतीचा पुरस्कार करून मनूचा कायदा हा सर्वात प्राचीन आणि आदर्श कायदा होता, असे म्हटले होते.
अर्थात संघाला आजही मनुस्मृती पवित्र वाटते. संघ आपल्या कृतीतून ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दाखवूनही देत असतो. याच मनुस्मृतीने वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला. ब्राह्मणीव्यवस्था उचलून धरली. एकाच गुन्ह्यासाठी विविध वर्णांना वेगळी शिक्षा सुनावणारी विषमता पुरस्कारली. शूद्र समाजावर जन्मजात गुलामी लादली. त्या मनुस्मृतीची भलावण करणाऱ्यांचे काय करायचं, हे जोपर्यंत भागवत स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत जातीविरहित समाज ही संघाची जाहीर सभेपुरता घेतलेली सोज्वळ भूमिका असणार आहे.
भारतीय एकता नव्हे, हिंदू एकता
हिंदू एकतेवर संघ नेहमीच भर देतो. हिंदू समाजाने एकत्र येऊन देश विकासात योगदान दिले पाहिजे, असे भागवत म्हणतात. परंतु देश विकास म्हणजे काय, केवळ हिंदूंनीच एक का व्हायचे ? अन्य समाजांचे योगदान देश विकासासाठी गरजेचे नाही, असे भागवतांना म्हणायचे आहे का? होय, त्यांना तसेच म्हणायचे आहे. अन्यथा त्यांनी साऱ्या भारतीय नागरिकांनी एक व्हावे, अशी राष्ट्रीय एकात्मतेला पूरक संविधानवादी भूमिका घेतली असती. पण संघाला हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व वाटते. ही संविधानविरोधी भूमिका आहे. (rss centenary celebration)
अशीच भूमिका समरसतेची आहे. संघाला समता या आधुनिक मूल्याचेच वावडे आहे. अर्थात त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव या संविधानाच्या उद्देशिकेमधील साऱ्याच मूल्यांचे वावडे आहे. म्हणूनच संघ सामाजिक समता हा शब्द न वापरता ‘सामाजिक समरसता’ हा शब्द आवर्जून वापरतो. मुंबईत भागवतांनी सामाजिक समरसतेचा महिमा वर्णन केला आणि विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये परस्पर सहकार्य आणि संवाद वाढवण्यावर भर दिला.
एकीकडे, देशाच्या हिंदूंनी एकत्र या म्हणायचे आणि दुसरीकडे, अन्य जाती धर्मियांना परस्पर सहकार्य वाढवण्यास सांगायचे यासारखा दुटप्पीपणा शोधून सापडायचा नाही. याचा अर्थ असा घ्यायचा, की कोणा हिंदूंना अभक्ष्य असलेले अन्न भक्षण केल्याने तथाकथित हिंदू धर्मरक्षक एखाद्याचा झुंडीने बळी घेत असतील, तर ते सर्वांनी समरसतेने पाहायचे, असा करावा लागेल. त्याचबरोबर देशातल्या दोन लोकांनी सारी संपत्ती मोदीकृपेने मिळवायची आणि ८० कोटी लोकांनी पाच किलो धान्य घेऊन देशात समरसतेने राहायचे असाही करावा लागेल.
संघाला समतेचे वावडे (rss centenary celebration)
संघाला समता या कल्पनेचीच अलर्जी आहे आणि ही अॅलर्जी लपविण्यासाठी संघाने समरसता हा शब्द शोधला आहे. एक प्रकारे हा मनुस्मृतीचाच पुरस्कार आहे. अन्यायपूर्ण समाज रचनेला आदर्श म्हणायचे, ही परंपरा टिकवण्याचे कार्य मनुस्मृती आणि तिचे समर्थक करत आले आहेत. वस्तुस्थिती ही आहे की हिंदू-हिंदू करणाऱ्या संघाने हिंदूंच्या उद्धाराचे लढे कधी दिलेच नाहीत. प्रश्न मंदिर प्रवेशाचा असो वा अस्पृश्यता निवारण्याचा, या प्रश्नांवर चळवळ उभारणे राहू द्या, सुरू असणाऱ्या चळवळींनाही संघाने कधी साधा मौखिक पाठिंबा दिलेला नाही. हिंदू कोड बिल, हिंदू समाजातील महिलांच्या जीवनात सुधारणा घडविण्यासाठी होते. त्याला विरोध करणारे लोक संघाच्याच विचारसरणीचे होते. संघाचे हिंदुत्व केवळ भाषणातले हिंदुत्व आहे. बहुजन हिंदू समाजाच्या हितासाठी संघाने कधीही भूमिका घेतलेली नाही. संघाचा तो अजेंडाच नाही.
भागवतांनी बांगलादेशमध्ये सव्वा कोटी हिंदू आहेत, असे म्हणून त्यांना एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे. खरंतर भागवतांनी बांगला देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा बीमोड करण्याचा सल्ला भारताचे छप्पन्न इंची छाती असलेले पहिले ‘नॉन बायोलॉजिकल’ पंतप्रधान ‘विश्वगुरू’ मोदींना द्यायला हवा होता. खरंतर बांगलादेशचाच बीमोड करून, त्याला भारतात सामील करून अखंड भारताची सुरुवात करायला सांगायला हवे होते. त्यांनी बांगलादेशातील हिंदूंना दिलासा मिळाला असता. असो. (rss centenary celebration)
सावरकरांना भारतरत्न
याच भाषणात सावरकरांना भारतरत्न दिल्यास तो भारतरत्न पुरस्काराचा गौरव होईल असे भागवतांनी म्हटले आहे. सावरकरांचे गौरवीकरण हा संघाचा अलीकडचा अजेंडा आहे आणि दुरूनही स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध नसल्याने तसे गौरवीकरण करणे हे संघाला भाग आहे. कारण निदान १९०८ पर्यंत सावरकर ब्रिटिशविरोधी लढ्यात सामील होते. नंतरच्या काळात हिंदुत्ववाद्यांची पाटी याबाबतीत कोरी आहे. (rss centenary celebration)
तुरुंगातून सुटका करून घेतलेल्या सावरकरांनी ब्रिटिश विरोधी कोणताही लढा दिला नाही. मात्र सुभाष चंद्र बोस यांची आझाद हिंद सेना ब्रिटिशांशी लढत असताना, ब्रिटिशांना सैन्य भरती करण्यास मदत करण्याची सर्वात मोठी देश सेवा सावरकरांनी केली. या महान देशसेवेबद्दल त्यांना भारतरत्न देऊन गौरवावे, असे भागवतांना वाटत असल्यास त्यांनी मोदी सरकारला तसे करण्यास सांगायला हवे. उदात्तीकरण करण्यास संघाकडे दुसरे कोणतेही व्यक्तिमत्व नाही.
थोडक्यात, भागवतांचे मुंबईतील भाषण संघाच्या दुटप्पीपणा या सातत्याला धरून झाले. शंभर वर्षांनीही संघ बदलला नाही, याबद्दल संघाचे अभिनंदन !
(डॉ. विवेक कोरडे यांची ‘जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ’, ‘गांधीची दुसरी हत्या’, ‘शहीद भगतसिंग’, ‘वैचारिक बंदुकांचे शेत’, ‘गांधीहत्येचे राजकारण’, ‘आरएसएस आणि नथुराम गोडसे’, ‘भगतसिंग, गांधी आणि सावरकर अपप्रचारामागचे वास्तव’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.)
ई मेल: drvivekkordeg@mail.com