नवी दिल्लीः पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, परदेश प्रवास टाळण्याचे आणि आत्मनिर्भरतेकडे वळण्याचे आवाहन केले. मात्र, दुस-याच दिवशी अनेक वाहनांचा ताफा घेऊन मोदींनी गुजरातमध्ये रोड शो केला. शिवाय लगेचच पंतप्रधान सात देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार प्रचार केल्यानंतर मोदी युएई, स्वीडन, नेदरलँड्स, नॉर्वे आणि इटलीसह सात देशांच्या दौऱ्यावर शुक्रवारी रवाना होणार आहेत. (Modi appeals for gold consumption and foreign trip)
हैदराबादमध्ये रविवारी झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी जागतिक संकटाच्या काळात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेट्रोचा वापर करण्याचा तसेच, मालवाहतुकीसाठी रेल्वेचा अधिक वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
राहुल गांधींचा पलटवार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधानांच्या आवाहनावर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, (Modi appeals for gold consumption and foreign trip)
“मोदीजींनी काल जनतेकडून त्याग मागितला — सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खत आणि खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उपदेश नाहीत; ही अपयशाची कबुली आहे. प्रत्येक वेळी जबाबदारी जनतेवर ढकलली जाते, जेणेकरून स्वतःची उत्तरदायित्व टाळता येईल.”
“देश चालवणे आता काँप्रमाईज्ड पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर गेले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
परदेश प्रवास आणि सोने खरेदीबाबत आवाहन
मध्यमवर्गीय जीवनशैलीचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, परदेशात विवाह समारंभ, पर्यटन आणि सुट्ट्या साजऱ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या संकटाच्या काळात किमान एक वर्ष परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे, तसेच सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदीही एक वर्ष टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोदी म्हणाले, “मी बऱ्याच काळापासून सांगत आहे की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल १० टक्क्यांनी कमी करा. त्यामुळे देशालाही मदत होईल आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल.” (Modi appeals for gold consumption and foreign trip)
रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, “काँग्रेस आता डाव्यांपेक्षाही अधिक डावी आणि मुस्लिम लीगपेक्षाही अधिक मुस्लिम झाली आहे.”
त्यांनी काँग्रेसला “एमएमसी” — म्हणजे “मुस्लिम लीग, माओवादी काँग्रेस” — अशी उपाधी दिली.