मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दवी मृत्यूनंतर रिक्तपदी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली. यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद शरद पवार आणि अजित पवार यांनी भूषवले होते. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रीय अध्यक्षपद अजित पवार यांच्याकडे होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांची निवड झाली.
प्रफुल पटेल यांनी प्रस्ताव मांडला
मुंबईतील वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आज गुरुवारी झाली. यावेळी पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी अनुमोदन दिले. तसेच सभागृहात उपस्थित सर्वांनी हात उंचावून निवडीला पाठिंबा दिला. (Sunetra Pawar elected as National President of NCP)
अजित पवारांच्या आदर्शावर पुढील वाटचाल
यावेळी बोलताना खासदार प्रफुल पटेल म्हणाले, अजितदादा आपल्यातून निघून गेले हे सर्वांसाठी धक्कादायक होते. यापुढे सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यरत राहील. विलिनीकरणाचा उल्लेख न करता ते म्हणाले, गेल्या माहिन्यात आपण पाहिले आहे की काहीजण बोलू लागले आहेत. आपल्या पक्षाशी काही संबध नसणारे बोलत आहेत. आम्ही काय करायचे ते सांगायला लागले आहेत. पोटात एक आणि ओठात एक बोलू लागले आहेत. आपण सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केले. आपण योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. यापुढे अजित पवारांच्या आदर्शावर पुढे जायचे आहे.
…तर अजितदादांच्या रुपाने सर्वोत्तम मुख्यमंत्री लाभला असता
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले, २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७३ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये सर्वात जास्त योगदान अजित पवार यांचे होते. सर्वात जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असता तर महाराष्ट्राने अजितदादांच्या रुपाने सर्वोत्तम् मुख्यमंत्री अनुभवला असता. (Sunetra Pawar elected as National President of NCP)
महाराष्ट्रात अजित पर्व सुरू होत आहे असे मी म्हणालो तेव्हा माझ्यावर टीका झाली होती. मी ठाम होतो. लोकसभा निवडणुकीत आपल्याला पराभव झाला. मी एकटा विजयी झालो. तेव्हा अजित पवार पहाटे कामाला सुरुवात करतात अशी टीका करण्यात आल्यावर पहाटे दूधवाला आणि पेपरवाला सेवा देतो अशी टीका करण्यात आली होती. अजित पवार कुणाच्या घरी भेटायला गेले अशीही टीका केली होती. पण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होता.
अजित पवारांवर मधल्या काळात २०१२ मध्ये खूप टीका झाली होती. पण त्यांना सुनेत्रा पवारांनी साथ केली. त्यामुळे त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा हक्क तुम्हाला आहे असेही तटकरे म्हणाले. (Sunetra Pawar elected as National President of NCP)