नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने या योजनेतून फक्त महात्मा गांधींचे नाव काढून टाकले नाही तर मनरेगावर बुलडोजर चालवला असल्याची टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने १८ डिसेंबर रोजी विरोधकांच्या प्रचंड गदारोळात भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) हे विधेयक मंजूर केले. नव्या रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधींचे नाव वगळण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. सोनिया गांधी यांनी आज नव्या विधेयकावरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. (The Modi government bulldozed MNREGA)
सोनिया गांधी यांनी सोशल मिडियावर पोस्ट केले आहे की, त्या म्हणाल्या, मनरेगा ही योजना रोजगाराच्या निमित्ताने कोणालाही आपले गाव, घर सोडून पलायन करावे लागू नये यासाठी ग्रामीण भागातच रोजगाराचा अधिकार देणारा कायदा होता. यामुळे थेट ग्राम पंचायतींना अधिकार आणि ताकद देण्यात आली होती. मनरेगा हे महात्मा गांधींच्या ग्राम स्वराज्याचे स्वप्न होते, त्या दिशेने उचललेले पाऊल होते. मात्र केंद्र सरकारने त्यावर बुलडोजर चालवला आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या की, गेल्या ११ वर्षांमध्ये मोदी सरकारने ग्रामीण भागातील बेरोजगार, गरीब आणि वंचित घटकांच्या हिताचा कधीही विचार केला नाही. त्याकडे दुर्लक्ष करुन मनरेगाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोविड महामारीच्या काळात मनरेगा हीच योजना गरीबांसाठी संजीवनी ठरली होती. (The Modi government bulldozed MNREGA)
केंद्र सरकारने नवा कायदा आणताना विरोधी पक्षाला विचारात घेतले नाही. कोणासोबतही चर्चा किंवा सल्ला-मसलत केली नाही. विरोधकांना विश्वासात न घेता मनमानीपणाने सरकारने रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधींचे नाव हटवण्यासोबतच या कायद्याचा मुळ उद्देशच संपवून टाकला आहे. आता कोणाला किती दिवस आणि कुठे रोजगार मिळणार आहे, हे वास्तविक परिस्थिती जाणून न घेता दिल्लीत बसून ठरवले जाणार आहे. (The Modi government bulldozed MNREGA)
मनरेगा लागू करण्यात काँग्रेसची महत्त्वाची भूमिका होती, मात्र हा काही फक्त आमच्या पक्षापुरता विषय नव्हता, तर देश आणि कोट्यवधी शेतकरी, श्रमिक आणि भूमीहिन, गरीबांच्या हिताची ही योजना होती. मोदी सरकारने मनरेगा बंद करुन त्यांच्या अधिकारांवरच हल्ला केला आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, २० वर्षांपूर्वी आपल्या देशातील गरीब बंधू-भगिनींना रोजगाराचा अधिकार मिळावा यासाठी लढा दिला होता, आता या काळ्या कायद्याविरोधात लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यक्रते याविरोधात लढा देतील असे त्यांनी स्पष्ट केले. (The Modi government bulldozed MNREGA)