कोल्हापूर : प्रतिनिधी : चैत्राच्या मध्यावरच महाराष्ट्रात वैशाख वणवा जाणवू लागला असून नागपूर, सोलापूर, मालेगाव, परभणी, अकोला शहराचा पारा चाळीशीपार झाला आहे. राज्यात सर्वाधीक तापमानाची नोंद ४२.४ सेल्सियस इतकी अकोला मध्ये नोंदवली गेली आहे.
पुढील चार दिवसात महाराष्ट्रात उष्णतेची लहर जाणवणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत उन्हाचा पारा चांगलाच चढला होता. आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने सार्वजनिक ठिकाणी वर्दळ कमी असली तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. सलग सुट्ट्या असल्याने पर्यटनस्थळावर पर्यटकांना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवला. तहान भागवण्यासाठी उसाचा रस, सरबत, तयार शीतपेयांना मागणी वाढली होती. ताक, लस्सीची मागणीही वाढली होती. कलिंगड, आंबे, द्राक्षे, टरबूज या फळांना ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली. दिवस मावळल्यानंतर उष्णतेही लहर कमी झाली नव्हती. त्यामुळे मोकळ्या हवेत फिरण्यासाठी बागा, मैदानावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रमुख शहरातील तापमानाची नोंद सेल्सियसमध्ये
मुंबई ३३.६, नागपूर ४१.०, पुणे ३८.५, औरंगाबाद ३९.९, नासिक ३८.१, कोल्हापूर ३८.४, सोलापूर ४१.०, रत्नागिरी ३३.६, सातारा ३८.२, सांगली ३८.८, मालेगाव ४१.८, जळगाव ३९.०, परभणी ४०.६, अकोला ४२.४, पणजी ३४.२.
हेही वाचा :