बेळगाव : प्रतिनिधी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक अर्जूनराव दळवी यांचे मंगळवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समितीची हानी झाली आहे.
सीमा प्रश्नाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. सीमा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बेळगाव ते मुंबई सायकल मोर्चा काढला होता.काळा दिन सायकल फेरी काढताना अडवणाऱ्या पोलिसांना सडेतोड उत्तर देऊन आपल्या निर्भीड बाण्याचे दर्शन त्यांनी घडवले होते. महामेळावा प्रसंगी तर पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर देखील गनिमी काव्याने महामेळावा स्थळी दाखल होऊन कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला मराठी माणूस दाद देत नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले होते. पोलिसांनी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले पण ते कधीही डगमगले नाहीत. अंगावर अनेक गुन्हे असूनही सीमा लढ्यात ते सदैव कार्यरत राहिले. (Deepak Dalvi, President of the Maharashtra Ekikaran Samiti, passes away)
सीमालढ्यात तरुण पिढीला सक्रीय करून त्यांचे नेतृत्व देखील तयार केले. सीमालढ्यात चौथी पिढी सक्रीय करून त्यांच्यात दळवी यांनी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले. प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांशी सतत संपर्क साधून संवाद साधण्याचे त्यांनी कार्य केले. सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्न दाव्याची सुनावणी लवकर व्हावी म्हणून ते अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. मराठा बँकेचे संचालक, तुकाराम बँकेचे चेअरमन अशा विविध जबाबदारीची पदे त्यांनी समर्थपणे भूषवली. मराठा समाजात देखील त्यांना मानाचे स्थान होते. (Deepak Dalvi, President of the Maharashtra Ekikaran Samiti, passes away)