मुंबई : प्रतिनिधी : तब्बल वीस वर्षांनी पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची न्यायाधीश नावंदर यांनी ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी यांनी या खटल्यासाठी पाठपुरावा केला होता. निकाल देताना कोर्टाने काही कारणांमुळे निकाल देण्यास विलंब झाला. मात्र लोकनेत्याची हत्या होणे ही अत्यंत दुर्दवी घटना आहे अशी टिपण्णी केली आहे. (Pawanraje Nimbalkar murder case)
३ जून २००६ रोजी मुंबईहून उस्मानाबादकडे जाताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पवनराजे आणि त्याच्या वाहनाचा चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात पद्मसिंह पाटील यांना अटकही करण्यात आली होती. त्यांना तुरुंगातही टाकले होते. नंतर ते जामिनावर बाहेर आले. तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वैमनस्यातून पवनराजेंची हत्या झाली होती. (Pawanraje Nimbalkar murder case)
निकाल देताना कोर्टाने निरीक्षण नोंदवले असून या प्रकरणात आरोपीविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. माफीचा साक्षीदार फितूर झला. त्याची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही. तसेच काही अर्जावर स्वाक्षरी नसल्यासह तपासात अनेक त्रुटी आढळून आल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सुरवातीला हा तपास कळंबोली पोलिसांकडे होता. त्यानंतर तो नवी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्या तपासावर पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या गुन्हा तपास सीबीआयकडे सोपवला.
सीबीआयने गुन्हयाचा तपास करताना १२७ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. एका आरोपीला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते. या खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ आरोपी होते. राजकीय वैमनस्यांतून २५ लाखाची सुपारी देऊन हत्याकांड घडवल्याचा आरोप सीबीआयने केला होता.
कोण होता माफीचा साक्षीदार
या गुन्ह्यात पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार होता. जैन यांच्या म्हणण्यानुसार गुन्हे शाखेने त्याला ८ सप्टेंबर २००९ मधून मुंब्रा येथून ताब्यात घेतले. मात्र अधिकृत अटक २५ सप्टेंबर दाखवली. त्याला बेकायदेशीरपणे १५ दिवस मारहाण करुन त्याचा कबुलीजवाब घेतला. हा पहिला जवाब कायद्याला धरुन नव्हता. माफीचा साक्षीदार जैन याने पैशासाठी गुन्हा केल्याचा दावा केला होता. जो न्यायालयाने फेटाळून लावला. साक्षीदार जैन याची मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर या ठिकाणी अनेक घरे आणि मिठाईची दुकाने आहेत. त्याच्याकडे साडेचार किलो सोन्याचे भांडवल होते. त्याचा कुठलाही उद्योग डबघाईला आलेला नव्हता. अशा परिस्थिती त्याला केवळ ५० हजार रुपयांची गरज होती म्हणून त्याने एवढी मोठी हत्या केली हे अजिबात पटणार नाही. त्याला सोयीनुसार खोटे बोलण्याची सवय आहे. (Pawanraje Nimbalkar murder case)