नवी दिल्ली : युद्धभूमी पर्यटनाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी. भारताचा देदीप्यमान लष्करी वारसा सामान्य नागरिक आणि पर्यटकांनाही समजावा, यासाठी भारतीय लष्कराने युद्धभूमीवर पर्यटनाची सोय केली आहे. १९६२ मध्ये चीनबरोबर झालेल्या युद्धातील रेझांग ला आणि किबिथू युद्धभूमीचा काही भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.(Battlefield Tourism)
संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना अरुणाचल प्रदेशातील किबिथू आणि बम ला पास आणि लडाखमधील रेझांग ला आणि पँगॉन्ग त्सो येथे प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. डोकलाम येथे अलीकडे म्हणजे २०१७ मध्ये चिनी सैनिकांसोबत संघर्ष झडला होता. ते ठिकाणही पर्यटकांसाठी लवकरच खुले करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने विकसीत केलेली भारत रणभूमी दर्शन ही वेबसाइट नुकतीच सुरू करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिचे लोकार्पण केले.(Battlefield Tourism)
तत्पूर्वी, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराने सीमावर्ती भागाच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटन, दळणवळण आणि शिक्षण या चार स्तंभांच्या आधारे हा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. यामागे सांस्कृतिक पुनरुज्जीवन हा मुख्य आधार असल्याचे ते म्हणाले.
लष्करी पर्यटनस्थळे
लष्करी पर्यटन भारतासाठी नवीन नाही. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धाचे कारगील द्रास वॉर मेमोरियल आणि १९६२ मध्ये चीनसोबत अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या युद्धाचे वालोंग युद्ध स्मारक ही पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. तवांग वॉर मेमोरियल, डोगराई वॉर मेमोरियल, सियाचीन वॉर मेमोरियल, लोंगेवाला वॉर मेमोरियल, ऑपरेशन मेघदूत वॉर मेमोरियल आणि जसवंत गढ वॉर मेमोरियल यांचाही या स्मारकांमध्ये समावेश आहे.