जयपूर : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या नव्या मोसमामध्ये राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या तीन सामन्यांकरिता रियान परागकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन हा बोटाच्या दुखापतीतून सावरत असून तो सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये केवळ फलंदाज म्हणून खेळेल. (Rajasthan Royals)
या दुखापतीवर उपचार घेतल्यानंततर सॅमसनने बीसीसीआयच्या सेंटर फॉर एक्सलन्समध्ये सराव सुरू केला. त्यानंतर, तो राजस्थान संघामध्ये दाखल झाला आहे. अद्याप तो यष्टिरक्षण करण्यासाठी पुरेसा फिट नसल्याने केवळ फलंदाज म्हणून खेळणार आहे. या सामन्यांमध्ये ध्रुव जुरेल ‘इम्पॅक्ट सब’ खेळाडू म्हणून यष्टिरक्षण करेल. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यावेळी सॅमसनच्या बोटास दुखापत झाली होती. त्या सामन्यातही जुरेलने बदली खेळाडू म्हणून यष्टिरक्षण केले होते. दरम्यान, रियान प्रथमच राजस्थान संघाचे कर्णधारपद भूषवेल. या मोसमासाठी लिलाव होण्यापूर्वी राजस्थानने १४ कोटी रुपये मोजून रियानला संघात कायम ठेवले होते. आयपीएल-२०२५ मध्ये राजस्थानचा सलामीचा सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादशी गुवाहाटी येथे होणार आहे. (Rajasthan Royals)
चेंडूवर लाळेचा वापर करण्यास परवानगी
आयपीएलच्या नव्या मोसमामध्ये चेंडूवर लाळेचा वापर करण्यास गोलंदाजांना परवानगी देण्यात आली आहे. मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईमध्ये झालेल्या आयपीएल कर्णधारांच्या बैठकीदरम्यान लाळेचा वापर करण्याच्या बाजूने मत मांडण्यात आले. त्यानुसार ही परवानगी देण्यात आली. क्रिकेटमध्ये चेंडू जुना झाल्यानंतर त्याच्या एका बाजूला चकाकी आणण्यासाठी गोलंदाजांकडून लाळेचा वापर करण्यात येतो. विशेषत: वेगवान गोलंदाजांना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी याचा उपयोग होतो.(Rajasthan Royals)
कोव्हिड-१९ नंतर क्रिकेटला सुरुवात करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आरोग्यविषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने लाळेच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली होती. सप्टेंबर, २०२२ मध्ये ही बंदी कायमस्वरूपी करण्यात आली. त्यामुळे, गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी केवळ घामाचा वापर करण्याचा पर्याय उरला होता. जसप्रीत बुमराह, महंमद शमी यांसारख्या भारतीय गोलंदाजांनी वेळोवेळी लाळेच्या वापरावरील बंदी उठवण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते. व्हेरनॉन फिलँडर, टीम साउदी यांसारख्या माजी गोलंदाजांनीही या मागणीला दुजोरा दिला होता. त्याचप्रमाणे, आयपीएलच्या रात्रीच्या सामन्यांच्या दुसऱ्या डावात चेंडूवर होणारा दवाचा परिणाम लक्षात घेता दहा षटकांनंतर नवा चेंडू वापरण्याचाही निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा :
भारतीय संघाला ५८ कोटींचे बक्षीस