नवी दिल्ली : दोन दशकांहून अधिक काळ जनगणना करण्यात आलेली नाही. यावेळी ती होतेय की नाही हे माहीत नाही, अशी स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी मोदी सरकारवर कडक शब्दांत टीका केली. जनगणना न करण्यामागील त्यांचा ‘खरा हेतू’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांना ‘हिंदीया’ निर्माण करायचा आहे आणि त्यादृष्टीने उचललेले हे पाऊल आहे, असा आरोप त्यांनी केला.(Kamal Haasan)
लोकसभेच्या जागांच्या सीमांकनावरून त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार कडक टीका केली. ‘‘त्यांचा हा मनमानी निर्णय त्याच पद्धतीचा आहे,’’ असे ते म्हणाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बुधवारी (५ मार्च) ते सहभाग झाले होते. जनगणनेत सतत होणाऱ्या विलंबाचा उल्लेख करत हासन म्हणाले, ‘‘यामागील खरा हेतू हिंदी भाषिक राज्यांमध्ये सत्तेचे केंद्रीकरण करणे आणि आपल्या बाजूने निवडणुकांचे निकाल सुनिश्चित करणे हा आहे’’ असा आरोप त्यांनी केला. (Kamal Haasan)
ते म्हणाले, ‘‘आम्ही समावेशक भारताची कल्पना करतो, परंतु ते ‘हिंदीया’ निर्माण करू इच्छितात. जे तुटलेले नाही ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न का करायचा? लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे मतदारसंघाची कशीही पुनर्रचना केली तरी सर्वांत जास्त परिणाम नेहमीच गैर-हिंदी भाषिक राज्यांवर होतील. हे पाऊल संघराज्याला कमकुवत करते. हा प्रकार पूर्णपणे अनावश्यक आहे.’’
‘‘केवळ आज किंवा उद्या नाही तर संसदीय प्रतिनिधींची संख्या कायम ठेवणे हे लोकशाही, संघराज्यवाद आणि भारताची विविधता जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एक भारतीय म्हणून, एक तमिळ म्हणून आणि मक्कल नीधी मैयमचा प्रतिनिधी म्हणून मी यावर जोरदार भर देतो,’’ असे ते पुढे म्हणाले. (Kamal Haasan)
राज्यांच्या कारभारात घुसखोरी
केंद्र सरकार राज्यांच्या कारभारात घुसखोरी करत आहे. ज्या राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्या राज्यांवर अतिरिक्त निधीची उधळण करण्यात येत आहे. तर तामिळनाडूच्या संसाधनांच्या योग्य वाट्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकार “त्रिभाषिक धोरणाच्या नावावर हिंदी भाषेची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक मदतीचा वापर करत आहे’, असा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारांवर या धोरणाचे पालन करण्यासाठी दबाव आणत आहे, असे ते म्हणाले. (Kamal Haasan)
जर त्यांना जागांची लोकसभेच्या जागांची संख्या वाढवायची असेल तर विधानसभेच्या जागाही वाढवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
माध्यमांशी बोलताना हासन म्हणाले की सध्याच्या संसदीय जागा पुरेशा आहेत आणि त्यात वाढ करण्याची आवश्यकता नाही. ‘‘माझे मत असे आहे की हे ४५३ (जागा) बदलण्याची गरज नाही. १४५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाच्या विकासात ४५३ सदस्यांनीच इथंपर्यंत आणले आहे, ते पुरेसे आहे,’’ याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.
हेही वाचा :
भाजपच्या जयकुमार गोरेकडून महिलेचा छळ