राजकारण
सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले
संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे
कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त,
माजी काळजीवाहू मुख्यमंत्री,
विद्यमान उपमुख्यमंत्री
माननीय श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांचे चरणी
कोपरापासून हात जोडून
साष्-टांग नमस्कार.
नको इतके बहुमत महाराष्ट्र विधान निवडणुकीत महायुतीला मिळाल्यानंतर प्रस्तावित मुख्यमंत्रीपदाबाबत बरीच भवती न भवती झाल्यावर या शर्यतीतून माघार घेतल्याबद्दल आपले करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे आणि मानावे तेवढे आभार कमीच आहेत. निवडणुकीचे निदान आल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव आपण आपल्या दरे या गावी निघून गेल्याने महायुतीच्या बैठका लांबल्या आणि फडणविसांची काळजी एवढी वाढली की शिंदेंना मुख्यमंत्री करा-मी काळजीवाहू आहेच असं ते आपल्या श्रेष्ठींना सांगतात की काय अशी भीती संघ परिवाराला वाटू लागली. विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीला असे निर्विवाद बहुमत मिळाले असते आणि तरीही त्यांनी वेळकाढूपणा केला असता तर सन्माननीय राज्यपाल महोदयांनी दोन-तीन दिवस वाट बघून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली असती. तथापी, ते तर बिचारे हुकूमाचे ताबेदार असल्याने तुम्ही मंडळी सरकार कधी स्थापन करता याची वाट पहात बसले.
शेवटी कसा का होईना पण शपथविधी समारंभ संपन्न झाला. खरे तर‘दिल्या-घेतल्या वचनांची शपथ तुला नाही.. खिशातल्या चोर खिशाची शपथतुला नाही..?’ अशी राजकारण्यांची सार्वत्रिक प्रसिध्दी आहे.
आम्हाला तर पहाट झाली रे झाली की तो पहाटेचा शपथविधी आठवतो. कोंबड्याचं आरवणं कानी येण्याआधी ‘मी अमुक तमुक ढमुक इश्वराला स्मरुन शपथ घेतो की..’ असे शब्द ऐकू येऊ लागतात.
पण त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंचे मुख्यमंत्रीपद आणि महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद जेमतेम अडीच दिवस टिकले होते. तेव्हा पहाटेच्या शपथा लाभत नाहीत, असे लक्षात आल्यावर, यावेळी गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला, हे ठीकच झाले. (Open letter to eknath shinde)
‘अडीच वर्षांपूर्वी देवेंद्रफडणवीस यांनी माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मला त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करताना आनंद होत आहे’, असं आपण म्हणालात खरं, पण त्यांना परत मुख्यमंत्रीपदी येताना पाहून आपणांस किती दु:ख झाले असेल, याची कल्पना केवळ आपले पूर्वाश्रमीचे नेते उद्धव ठाकरे हेच करु शकतात.
खरे म्हणजे राजकारणातल्या पुढारी मंडळींनी आता खालच्या जागेवर काम करणे, ही पदावनती मानता कामा न्ये. क्रिकेटमध्ये कसं जेव्हा गावसकर कॅप्टन होता, तेव्हा कपिलदेव त्याच्या टीममध्ये खेळत होता. नंतर कपिलदेव कॅप्टन झाला आणि गावसकर त्याच्या टीममध्ये होता. म्हणजे एक प्रमुखअसताना दुसरा त्याच्याखाली आणि हा दुसरा प्रमुख होतो तेव्हा पहिलात्याच्या खाली. हे क्रिकेटमध्ये ज्या सहजतेनं स्वाकरलं गेलं आहे, त्याप्रमाणे राजकारणात तुम्ही मंडळी सहज का स्वीकारत नाही? आपणही शिंदेसाहेब यावेळी महायुती प्रचंड बहुमताने निवडून येऊनही आणि त्यात भारतीय जनता पक्षाला आपल्या नवशिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळूनही देवाभाऊंच्या मुख्यमंत्रीपदी येण्यासाठी अडथळे आणायला नको होते. अशा नाकाबंदीमधून कसं सुटयचं याचा पूर्यानुभव दांडगा आहे हो. ते बिचारे तुमची समजूत काढता काढता अगदी बेसुमार घामाघूम झाले. एकवेळ अमृतावहिनींची समजूत घालणं परवडलं; पण तुमचा रुसवा कसा काढावा हे त्या गरीबांच्या चाणक्यालाही कळेना.
अखेर याहीवेळी मंत्रीपदाचे इच्छुक असलेले आपल्या गटातील काही व्यवहारवादी इसम जसे की उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील वगैरेंनी ‘वर्षा’वर धाव घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सत्तेव असणे कसं आवश्यक आहे याविषयी आपली शाळा घेतली आणि एकंदरीत रागरंग पाहून मिळेल त्यावर समाधान मानून आपण अगदी शेवटच्या अर्ध्या तासात आपणही शपथ घेणार आहात, असे राज्यपाल महोदयांना कळविले हे शहाणपणाचे आहे. (Open letter to eknath shinde)
आपण प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करता, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. तथापी, फडणवीस आणि अजित पवार हेही थेट लोकांमध्येच जाऊन काम करणारे नेते आहेत. शिवाय ते आपल्या एवढेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे तिघांपैकी एक कोणीतरी मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच, अशी अटकळ आम्ही पत्रकारांनी बांधली होती. पण ‘पायाला भिंगरी लावून काम करणाराच मुख्यमंत्री होतो’ असा निकष लावला तर अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठीपुढे येऊ शकतात. मुरलीधर मोहोळ यांचे नांव अचानक पुढे आले आणि मिडियामध्ये त्याचा एवढा प्रचार झाला की शेवटी दस्तुरखुद्द मोहोळ यांनाच खुलासा करुन मुख्यमंत्रीपदाशी आपला काही संबंध नाही, असं जाहीर करावं लागलं. डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण यांचही नाव काही काळ पुढे येऊनच र्चेत राहीलं. ते खुलासा वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता मंगळवारी थेट आंगणेवाडीत गेले आणि भराडी देवीला गाऱ्हाणं घालून म्हणाले की ‘देवी भराडी आई, कृपाकरुन जे आहे ते सार्वजनिक बांधकाम खातं माझ्याजवळ राहील अशी व्यवस्था केलीस तरी पुरे. मला मुख्यमंत्री, गृहमंत्री वगैरे व्हायची अजिबात इच्छा नाही.’
तुम्ही छगन भुजबळांसारख्या एकेकाळी राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या गृहस्थांना विचारले असते तर त्या खात्यासाठी हट्ट न धरण्याचा सल्ला त्यांनीही तुंम्हास दिला असता. याचे कारण म्हणजे भुजबळांच्या मते कुठे एकादी कोंबडी चोरीला गेली किंवा रात्री दारु पिऊन श्रीमंतांच्या बाळांनी पोर्शे कारवर निबंध लिहिण्यासाठी म्हणून कुणाला तरी ठोकलं, तरी लोक गृहमंत्र्यांनाच थेट जबाबदार धरतात. आपण सुद्धा गृहमंत्रालयाचे काम अंगावर घेऊन कारणन सताना पायांना भिंगरी लावण्याचे उद्दिष्ट ठेवू नये, अशी विनंती आहे. गृहमंत्रालयासाठी काम करणे म्हणजे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणेआणि पोलिसांना एखाद्या गुन्हेगाराचा थेट मर्डर करण्याचा गुप्त आदेश देऊन झटपट न्यायदान करणे होय. आपण तर अतिशय साधे, सरळ, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहात. तेव्हा…
स्वाभिमान वगैरे ठेवून कोणाकडे काही
मागण्याची वेळ
आपल्यावर येऊ नये असे वाटणारा,
आपला,
लाडका विनम्र बालक
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. (Sharad Pawar Kolhapur)
एका खासगी कार्यक्रमासाठी पवार शनिवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार यांनी या निवडणुकीत राजकीय पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि मिळालेले यश याकडे आकडेवारीसह लक्ष वेधले.
ते म्हणाले, ८० लाख मते मिळालेल्या पक्षाचे १५ उमेदवार निवडून आले आहेत तर ७९ लाख मते मिळालेल्या पक्षाचे ५७ उमेदवार निवडून आले. त्यांना एक लाख मते कमी मिळाली आहेत. तरीही त्यांचे इतके उमेदवार निवडून आले. दुसरीकडे ५८ लाख मते मिळालेल्या पक्षाचे ४१ उमेदवार निवडून आले आणि ७२ लाख मते घेतलेल्या पक्षाचे केवळ दहाच उमदेवार निवडून आले आहेत. हा सर्व प्रकार अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पवार यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. निवडणुकीनंतर महाराष्ट्रात एक उत्साहाचे वातावरण असते. मात्र तसे वातावरण आता दिसत नाही. छोट्या राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आहे तर मोठ्या राज्यात भाजप आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्ही इव्हीएमच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत विश्वासार्ह माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आम्हाला वातावरण अनुकूल होते. सभा जोरदार झाल्या, पण निकाल वेगळा लागला. प्रचाराची सभा बघूनच कोणता उमेदवार जिंकणार हे कळते. कोल्हापुरातही आमच्या उमेदवारांच्या सभा जोरदार झाल्या. पण त्यांचा पराभव झाला. भविष्यातील सर्व निवडणुका आघाडीच्या माध्यमातून एकत्रच लढणार आहोत. (Sharad Pawar Kolhapur)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटसंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘मग त्यांचं काय? त्यांचा निकाल लागला आहे. त्याच्यावर आता काय भाष्य करायचं? ज्यांनी निर्णय घेतले त्यांनी एकदा लोकांसमोर स्वच्छ चित्र मांडावे, असे शरद पवार म्हणाले.
मोठ्या राज्यांत भाजप, छोट्या राज्यांत इतर पक्ष
महाराष्ट्राच्या निवडणुकाआधी चार राज्यांच्या निवडणुका झाल्या. हरियाणात मी स्वत: गेलो होते. तिथे भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण तिथे भाजपा सत्तेवर आली. काश्मिरमध्ये निवडणूक झाली. तिथे फारूक अब्दुल्ल यांचा पक्ष आला. महाराष्ट्राची निवडणूक झाली. येथे भाजपला यश आले. झारखंडमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. म्हणजे मोठी राज्ये आहेत तिथे भाजप आणि छोटी राज्ये आहेत तिथे अन्य पक्ष सत्तेवर आले आहेत. कदाचित ते आम्ही एका ठिकाणी सत्तेत आहोत विरोधी पक्षही काही राज्यात सत्तेवर आले आहे, असे सांगून त्याचे समर्थन करू शकतात, अशी टीकाही पवार यांनी भाजपवर केली.
मारकडवाडीला जाणार
राज्यात निवडणूक प्रक्रिया होऊन गेली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीतील लोकांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पण प्रशासनाने त्याला विरोध दर्शविला. तेथे १४४ सारखे कलम लावले. त्याची गरजच काय? त्यामुळे गावातल्या लोकांचे म्हणणे काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मी मारकडवाडीत जाणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :
- महिला बचत गट प्रमुखाच्या मुलाने दिली दरोड्याची टीप
- Maharashtra Assembly : सत्ताधाऱ्यांचे गुलाबी, भगवे फेटे; विरोधकांचा बहिष्कार
- दुबईहून बाशिंग बांधून आला पण…
पाटणा : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. साहजिकच या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची जागा घेतली. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलानंतर बिहारमधील जनदा दल (युनायटेड) च्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नितिशकुमारही अलर्ट मोडवर आले आहेत. (Nitish Kumar)
बिहार विधानसभेच्या निवडणुका २०२५ मध्ये होत आहेत. या निवडणुका नितीशकुमार यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचे भाजप सांगत आहे. तथापि, महाराष्ट्रासारखाच प्रयोग तेथे झाला आणि भाजपने १२२ हा बहुमताचा आकडा गाठला तर ‘जदयु’चे काय होणार, अशी चिंता या पक्षातील धुरिणांना सतावू लागली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
२०२०च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ‘जदयु’ला ४३ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ७४ जागा मिळाल्या होत्या. तरीही भाजपने सत्तेसाठी नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही भाजपने एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या. शिंदे यांना आपल्यालाच मुख्यमंत्रिपद मिळेल, असे वाटत होते. तथापि, भाजपने फासे पलटले. जास्त जागा मिळाल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आणि ते पद पदरात पाडूनही घेतले. अशीच स्थिती बिहारमध्ये झाली तर काय होणार, असा प्रश्न आता ‘जदयू’ नेत्यांपुढे निर्माण झाला आहे.
याबाबत कुणी उघड बोलत नसले तरी ‘जदयु’च्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचाराचे नेतृत्व शिंदे यांनी केले. त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. ‘बिहार मॉडेल’ स्वीकारण्याचा प्रस्ताव शिंदे यांनी दिला होता. मात्र तो भाजपने नाकारला. शिंदे यांचा अपेक्षाभंग झाला. या पार्श्वभूमीवर ‘जदयु’ला नितीशकुमार यांच्या भवितव्याची चिंता लागली आहे.
‘नितीशकुमार सत्तेसाठी हपापलेले नाहीत. पक्षाला कमी जागा मिळाल्यामुळे २०२० मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपद नाकारले होते. परंतु राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव यांच्या आग्रहाखातर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती,’ असे जदयुच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
जदयुचा आणखी एक नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर स्थिती डळमळीत असली तरी बिहारची परिस्थिती वेगळी आहे. शिंदे यांच्याकडे पर्यायांचा अभाव आहे. शिवसेनेचे दोन्ही गट हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. विशेष म्हणजे ‘जदयु’च्या तुलनेत शिंदे यांच्या पक्षाचा सामाजिक पाया कमकुवत आहे. ‘जदयु’ला लोकसभा निवडणुकीत १६.५ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येथे रालोआने ४० पैकी ३० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
हेही वाचा :