Home » Blog » Vilas Zunjar झुंजार पत्रकार

Vilas Zunjar झुंजार पत्रकार

कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार विलासराव झुंजार यांनी २० फेब्रूवारी २०२५ रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त...

by प्रतिनिधी
0 comments

ज्येष्ठ पत्रकार विलासराव झुंजारकाका यांनी वयाचे शतक ठोकले. शंभर वर्षातली सुमारे साठ वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. जोपर्यंत हिंडता फिरता येत होते, तोपर्यंत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वृत्तांकन केले.

समाज आणि पुढारीचे ऋण

दैनिक समाजचे संपादक सर्जेराव पाटील यांना विलासराव आपले पत्रकारितेतले गुरू मानतात. त्यांचे बोट धरून आपण पत्रकारितेत आलो, असे ते कृतज्ञतापूर्वक सांगतात. पुढारीचे संपादक ग. गो. जाधव यांनी त्यांची पुढारीमध्ये वार्ताहर म्हणून नियुक्ती केली, तो काळ सुमारे सत्तर वर्षांपूर्वीचा असावा. त्यावेळी त्यांना दरमहा पगार होता वीस रुपये. झुंजारकाका त्या काळाबद्दल सांगतात की, तो काळ म्हणझे दैनिकांचे स्वतः मालक पट्टी काढून चोरुन हातभट्टी पीत असत. तीदेखील दोन रुपये शिसा दराची. मग आमच्यासारख्या आलतू-फालतू बातमीदाराचे काय?

झुंजारकाकांनी पुढारीत सुमारे दहा वर्षे काम केले. पगारवाढ मिळवण्यासाठी भांडावे लागे, तेवढे वगळता आपला पुढारीतील काळ चांगला गेल्याचे ते नोंदवतात. बेळगावच्या तरुण भारतची कोल्हापुरात आवृत्ती सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात या आवृत्तीचे मार्गदर्शक म्हणून झुंजार काकांनी काम केले. तरीसुद्धा झुंजार काकांची ओळख निर्माण झाली, ती महाराष्ट्र टाइम्समुळे.

महाराष्ट्र टाइम्सशी दीर्घकाळ नाते

महाराष्ट्र टाइम्सचे कोल्हापूर प्रतिनिधी म्हणून त्यांनी सुमारे ३५ वर्षे काम केले. त्या काळात महाराष्ट्र टाइम्स दुपारी कोल्हापुरात यायचा. परंतु त्याचा खास वाचकवर्ग होता, तो महाराष्ट्र टाइम्सची वाट पाहात असायचा. झुंजार काकांनी महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. जे विषय मांडायला स्थानिक वृत्तपत्रांना अडचण असायची, ते विषय महाराष्ट्र टाइम्समधून मांडले जायचे. त्यामुळे राज्य पातळीवरील वृत्तपत्राबरोबरच कोल्हापूरच्या वेगळ्या बातम्या देणारे वृत्तपत्र म्हणून त्यांच्या काळात महाराष्ट्र टाइम्सची ओळख होती. कुणाच्याही मिंध्यात न राहता त्यांनी आयुष्यभर स्वाभिमानाने पत्रकारिता केली. हातात लेखणी आहे म्हणून तिचा कधी स्वार्थासाठी उपयोग केला नाही. आणि कुणाचा मुलाहिजाही ठेवला नाही. एकदा त्यांनी फेरीवाल्यांच्या उपद्रवासंदर्भात बातमी दिली. फेरीवाल्यांनी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यात ते स्वतः सहभागी झाले होते.

वाईजवळ वास्तव्य

वीस फेब्रुवारीला (२०२५) त्यांनी वयाचे शतक पूर्ण केले. सध्या ते सातारा जिल्ह्यातील सोळशी येथे आपल्या मुलीकडे असतात. अनेक महिन्यांपासून त्यांना भेटण्याची इच्छा होती. ते वाईला असतात, अशी माहिती मिळाली होती. दरम्यान मध्यंतरी सहकारी सतीश घाटगे याच्यासोबत पुण्याहून परत येत असताना झुंजारकाका यांच्याकडे जायचे ठरले. त्यांचे जावई श्री. इंद्रसेन यादव यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक सतीशनेच मिळवला. आणि पूर्वकल्पना देऊन त्यांच्याकडे गेलो. (ते आमचेही पाहुणेच निघाले.) पुण्याहून येताना खंबाटकी घाट उतरल्यानंतर थोडे पुढे आल्यावर डावीकडे आत जो रस्ता जातो, त्या रस्त्याने सोळशीला जाता येते. स्वेटर, कानटोपी घातलेले विलासराव झुंजारकाका कोचवर बसले होते. मधला बराच काळ भेट नसल्यामुळे आणि वयामुळेही असेल, पण त्यांनी ओळखले नाही. पण नाव सांगितल्यावर ओळखले. मोकळेपणानं हसले. कोल्हापूरच्या आठवणी निघाल्या. स्मृती तेवढी तल्लख राहिली नसली तरी ब-यापैकी गोष्टी, जुनी माणसं त्यांना आठवत होती.

अनेकांशी मित्रत्वाचे संबंध

झुंजारकाका कोल्हापुरात होते, तेव्हा त्यांच्याशी माझे व्यक्तिशः जिव्हाळ्याचे संबंध होते. ऐंशीव्या वर्षीसुद्धा फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करायचे. छोट्या छोट्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. त्यांच्या या वृत्तीचे मला खूप कौतुक वाटायचे. पत्रकारितेत अनिष्ट गोष्टी फार पूर्वीपासून चालत आल्या होत्या, परंतु झुंझारकाका त्यापासून सुरक्षित अंतरावर राहिले. संतराम पाटील यांच्यापासून गोविंदराव पानसरेंच्यापर्यंत सगळ्या नेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध. पत्रकार परिषदेमध्ये कुणालाही निडरपणे भिडायचे. काहीही विचारायचे. कुणाची भीडभाड ठेवायचे नाहीत. राष्ट्रीय पातळीवरची व्यक्ती असली तरी प्रश्न मराठीत विचारायचे. त्यात संकोच बाळगायचे नाहीत. निडरपणा किती असावा?

निडर पत्रकार

एकदा भाजपनेते भैरोसिंग शेखावत कोल्हापूर दौ-यावर आले होते. त्यांची पत्रकार परिषद होती. शेखावत यांच्या कुणी संबंधिताने भ्रष्टाचार केला वगैरे काहीतरी चर्चा होती. शेखावत यांच्या मुलानेच भ्रष्टाचार केला इथपर्यंत ती चर्चा आली होती. माहिती अपुरी होती. एका पत्रकाराने त्यांना त्यासंदर्भात विचारले, की आपके सुपुत्र पर भ्रष्टाचार के आरोप लगे है… वगैरे. (प्रत्यक्षात शेखावत यांना मुलगा नाही, त्यांना एक मुलगी आहे.) त्यावर शेखावत म्हणाले की, मुझे कोई सुपुत्र नही है…त्यावर झुंझारकाकांनी विचारलं, मग कुपुत्र तरी आहे की नाही? शेखावत हसत म्हणाले, कुपुत्रही नाही. शरद पवार आणि माझ्यात साम्य आहे ते म्हणजे त्यांच्याप्रमाणेच मलाही एकच मुलगी आहे.

सामाजिक जाणिवेचे पत्रकार

माझ्या पत्रकारितेचे अगदी प्रारंभीचे दिवस होते. त्या काळात भारतीय जनता पक्ष, भारतीय किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महागाई किंवा तत्सम प्रश्नांवर आंदोलने करायचे. तहसिलदार कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करायचे. दहा-वीस कार्यकर्ते असायचे, पण पोलिसांबरोबर रेटारेटी व्हायची. वृत्तपत्रांना चांगले फोटो मिळायचे. पत्रकारितेशी संबंधित काही लोक अशा आंदोलनांची खिल्ली उडवायचे. मूठभरच लोक आहेत. फोटोसाठी नाटक करतात वगैरे. त्यात फोटोग्राफर्स आघाडीवर असायचे. माझ्यासारख्या नवख्यांनाही तशा कमेंट करायची सवय लागली होती.

अशाच एका आंदोलनावेळी घटनास्थळी झुंझारकाका आणि मी दोघेच रिपोर्टर होतो. त्यावेळी मी अशीच काहीतरी कमेंट केली की आंदोलक कमी आणि पोलिसच जास्त आहेत वगैरे. त्यावर झुंझारकाका म्हणाले, `हे लढणारे लोक आहेत. लोकांच्या प्रश्नावर संघर्ष करतात. आपण यांची ताकद वाढवायची काम करायचं…` झुंजारकाकांचं ते वाक्य माझ्या पत्रकारितेच्या आयुष्याला दिशा देणारं ठरलं. त्यांच्या त्या एका वाक्यानं माझी पत्रकारितेतली जीवननिष्ठा निश्चित केली. धन्यवाद झुंझारकाका !शतकाचं मोठ्या खेळीत रुपांतर करा, याच शुभेच्छा!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00