मुंबई : विशेष प्रतिनिधी : संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा झाला असला तरी त्याने प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी (५ मार्च) केली. (Vadettiwar)
बीडमध्ये अनेक गुन्हे घडले आहेत, खंडणी, खुनाच्या घटना घडल्या आहेत. मुंडे यांना सहआरोपी केल्यावर अशा अनेक गुन्ह्यांचा उलगडा होईल. महाराष्ट्र आता बिहारच्या पुढे गेला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Vadettiwar)
महायुती सरकारमधील एकेक मंत्र्यांचे प्रताप समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री, जो पैलवान आहे, त्याने एका महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवले. या प्रकरणी शिक्षा झाली तरी दहा हजार रुपये दंड भरून माफी मागतो आणि पुन्हा त्या महिलेच्या पाठी लागतो. त्या महिलेला ब्लॅकमेल केले जाते. भाजप मंत्र्यांचे हे वर्तन असेल तर राज्यातील महिला सुरक्षित कश्या असतील?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.(Vadettiwar)
दुसरे उत्तर महाराष्ट्रातील मंत्री. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची २६ एकर जमीन बळकावली. मंत्रिमंडळातील मंत्री असे काळे धंदे करत फिरतात. या मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, या मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. (Vadettiwar) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सांगितले. भाजपात प्रवेश करणार असल्याबाबतच्या चर्चेबाबत ते म्हणाले की, मी पुरोगामी विचारधारेशी जोडलो आहे. काँग्रेसचा मी निष्ठावान शिपाई आहे, पक्ष सोडण्याचा विचारही माझ्या मनात येत नाही. सत्ता येवो न येवो मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. याबाबत कोणीतरी अफवा पसरवत आहे.
हेही वाचा :
भाजपच्या जयकुमार गोरेकडून महिलेचा छळ