जमीर काझी : मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. लोकशाहीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘नोटा’चा पर्यायही आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी विरोधी उमेदवार नाही, तेथे मतदारांना ‘नोटा’ वापरण्याची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केली.
ते म्हणाले,’ भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात सुरु आहे,
निवडणुका या काही नवीन नाहीत, निकोप लोकशाहीत विरोधी पक्षांनाही तेवढेच महत्व आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात सहा बिगर काँग्रेसचे मंत्री होते, ही आपली संस्कृती व परंपरा आहे. पण विरोधकच नको अशी प्रवृत्ती भाजपा व महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला जात आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, दबाव तंत्राचा वापर करणे त्याचबरोबर पोलीस, प्रशासन यांच्या मदतीने बेशरमपणाचा खेळ सुरु आहे आणि निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षीदार बनला आहे, याचा आम्ही निषेध करतो. असे सपकाळ म्हणाले. (Provide the NOTA option in uncontested constituencies)
नार्वेकरांनी पदाची प्रतिष्ठा घालवली
संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष परिषदेचा सभापती ही संवैधानिक पदे आहेत, त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. पण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. अध्यक्षपदाच्या पहिल्या कारकिर्दीत त्यांनी पक्षातंर बंदी कायदा मोडीत काढून लोकशाही व संविधानाच्या छातीत सुरा खुपण्याचे काम केले, म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे. आता हे महाशय महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या नातेवाईकांसाठी अत्यंत खालच्या पातळीवर उतरले आहेत. विरोधकांना अर्ज भरू देण्यात अडथळा आणणे, विरोधकांना धमक्या देणे, पदाचा गैरवापर करणे अशा प्रकारचे वर्तन त्यांनी केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. (Provide the NOTA option in uncontested constituencies)
राष्ट्रपतींनी नार्वेकरांना पदावरुन हटवावे
राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन नार्वेकर यांना पदावरून बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. याप्रकरणी काँग्रेसने नार्वेकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पत्र पाठवले होते. पण निवडणुक आयोगाने पुरावे मागितले. घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यांना अडवण्यात आले धमक्या दिल्या त्यांच्या तक्रारी घेऊन कारवाई करावी. आता चौकशी अहवाल आला असला तरी त्यात केवळ शब्दच्छल करण्यात आलेला आहे. (Provide the NOTA option in uncontested constituencies)
सत्ताधारी महायुतीमध्ये नुरा कुस्ती
महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेतील तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून तेच एकमेकांवर टीका करत आहेत, हा प्रकार ‘मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर’, असा असून महायुतीत ‘नुरा कुस्ती’ सुरु आहे. एवढेच गंभीर आहेत तर अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे नाहीतर भाजपाने अजित पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा, असेही सपकाळ यांनी सांगितले.