जमीर काझी : मुंबई : लोकशाहीमध्ये कायदा सर्वांसाठी समान असतो असे सांगितले जाते. मात्र लोणी काळभोर येथे माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात सरकार, पोलीस यंत्रणा आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी आरोपींना वाचवण्यासाठीच धडपड करत आहेत का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांनी उपस्थित केला आहे. (Lawande raises questions regarding the police machinery)
त्यांनी सांगितले की, माझ्यावर केवळ शाईफेक झाली नाही, तर रिव्हॉल्वर रोखून दहशत निर्माण करण्यात आली, जीवे मारण्याचा उघड प्रयत्न करण्यात आला. या बाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊनही गंभीर कलमे लावण्यात पोलीसांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. त्यामुळे न्यायालयात माझे वकीलामार्फत अर्ज दाखल करून जीवे मारण्याचा प्रयत्न व शस्त्राचा वापर या संदर्भातील कलमे वाढवण्याची मागणी केली होती. याबाबत पोलीसांनी पुणे न्यायालयात सादर केलेला अहवाल धक्कादायक, पक्षपाती आणि आरोपींना संरक्षण देणारा आहे. आरोपी संग्राम भंडारे यांनी स्वतः घटनेचा व्हिडीओ प्रसारित केला, तरी त्या मध्ये रिव्हॉल्वरद्वारे दहशत निर्माण झाल्याचे दिसत नाही असा निष्कर्ष पोलीसांनी काढला आहे. याहून गंभीर बाब म्हणजे फिर्यादीच माध्यमांमध्ये वेगवेगळी माहिती देत असल्याचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Lawande raises questions regarding the police machinery)
आजपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मला साधी प्रत्यक्ष भेटही दिलेली नाही. तरीही न्यायालयात असा अहवाल दाखल होतो, याचा अर्थ स्पष्ट आहे आरोपींना वाचवण्यासाठी दबावाखाली काम सुरू आहे. सरकार मधील विद्यमान मंत्री, आमदार आणि सत्ताधारी मंडळी उघडपणे आरोपींच्या बाजूने उभी राहत असल्यामुळे तपासावर परिणाम होत आहे. महत्वाचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी संग्राम भंडारे अजूनही मोकाट फिरत असून खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे त्यांनी सांगितले. (Lawande raises questions regarding the police machinery)