बेळगाव : प्रतिनिधी : एका वाहनचालकाने जीव धोक्यात घालून हलात्री नदीच्या पुलावर पुराचे प्रचंड पाणी आलेले असतानाही गाडी घातली. असले नसते धाडस जीवावर बेतू शकते याची जाणीव त्या वाहनचालकाला नसावी काय, असा संताप ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असताना पाण्यातून गाडी चालवण्याचा स्टंट जीवावर बेतू शकतो. (Dangerous stunt)
खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हलात्री नदीच्या पुलावर पाणी आले आहे. या भागातील वाहतूक बंद झाली आहे. परंतु काही वाहनचालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून वाहने दामटत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी बॅरिकेडस लावावेत किंवा पोलीस बंदोबस्त ठेवून हा रस्ता बंद करण्याची मागणी जनतेतून होत आहे. (Dangerous stunt)
गेल्या वर्षी सुद्धा बेळगाव येथील एका दुचाकीस्वाराने हलात्री पुलावर पाणी आले असताना त्या पाण्यातून आपली दुचाकी गाडी घातली आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर दुचाकीसह तो वाहून गेला होता. दैव बलवत्तर म्हणून त्याच्या हाताला झाडाची फांदी लागली. ती पकडून तो झाडावर चढून बसल्याने वाचला.
काही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरील पाण्यातून गाड्या घालत आहेत. आज सुद्धा त्या पाण्यातून एका थारचालकाने आपला जीव धोक्यात घालून आपली गाडी घातली. सुदैवाने पाण्यातून तो सहीसलामत बाहेर आला.
हेही वाचा :
विमान अपघाताचे ठोस कारण समजणार