मुंबई : विशेष प्रतिनिधी : निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत या तत्त्वांना हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे. विधानसभेतील ‘मविआ’च्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. अवघ्या ६ महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे, अशी मागणी प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केली.(MVA’s Petitions)
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले, पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईत गांधी भवन येथे प्रवीण चक्रवर्ती, माजी मुख्यमंत्री चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर यांनी पत्रकार परिषदेत हे विषय उपस्थित केले.
चक्रवर्ती म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या ९.७ कोटी असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला, पण मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या तर ९.५४ कोटी आहे. या आकडेवारी लक्षात घेता १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी? मतदारयाद्या नोंदणीमध्ये अनेक घोळ करण्यात आले आहेत. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात एकाच पत्त्यावर ५ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली, या मतदारांकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी ओळखपत्र, रहिवाशी दाखल्याची विचारणा केली असता ते स्थानिक रहिवाशी नसल्याचे उघड झाले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली असता त्यावर उत्तर मिळाले नाही.(MVA’s Petitions)
लोकसभा निवडणुकीनंतर १३२ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी २० ते २५ हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. लोकसभेला ६२ विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती, पण विधानसभेला याच १३२ मतदारसंघातून ११२ जागी महायुतीचा विजय झाला, हे महत्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (MVA’s Petitions)
विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदार याद्यांमधील घोळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे. विधानसभेतील मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. भारतातील लोकशाही प्रगल्भ असून जगाचे आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे लक्ष असते, निवडणूक आयोग निवडणुकीत पक्षपात करत असेल तर ते लोकशाहीसाठी चिंताजनक आहे.
-पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
हेही वाचा :
एसटी भाडेवाडीचा दणका