कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात शनिवारी (१२ एप्रिल) पुन्हा हिंसाचार उसळला. हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला. यांपैकी दोघांचा मृत्यु जातीय दंगलीवेळी, तर सुती येथे शुक्रवारी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा काही काळापूर्वीच मृत्यू झाला आहे,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
कोलकाता उच्च न्यायालयाने शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यात केंद्रीय निमलष्करी दल तैनात करण्याचे आदेश दिले. विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयीन सुट्टीच्या दिवशी विशेष सुनावणी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी मुर्शिदाबाद येथे पुन्हा हिंसाचार उफाळला. जमावाला शांत करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी बळाचा वापर केला. धुलियान, समसेरगंज ब्लॉकमध्ये एका व्यक्तीला गोळी लागली. शुक्रवारी वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सुती आणि समसेरगंज भागात मोठ्या प्रमाणात अशांतता आणि तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर शनिवारी हिंसाचार झाला.(Anti waqf protest)
कोलकाता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) जावेद शमीम यांनी घटनेबद्दल बोलताना हा गोळीबार बीएसएफ कर्मचाऱ्यांकडून हा गोळीबार झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला. प्राथमिक माहितीवरून असे सूचित केले की गोळीबार स्थानिक पोलिसांपेक्षा बीएसएफ कर्मचाऱ्यांकडून झाला असावा. जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे, असे ते म्हणाले. (Anti waqf protest)
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगली वणव्यासारख्या पसरत आहेत. त्यामुळे मी केंद्रीय निमलष्करी दलांच्या मागणीसाठी राज्य सरकारकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने ती स्वीकारली नाही. त्यामुळे माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. मी तातडीने सुनावणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली, असे कोर्टाच्या आदेशानंतर सुवेंदू अधिकारी म्हणाले.
हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही चिथावणीला बळी पडू नका. प्रत्येकाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र त्यामुळे पश्चिम बंगालच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही, याची दक्षता घ्या. या भाषणस्वातंत्र्याने पश्चिम बंगालला जबर किंमत द्यायला लागू नये.
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
शुक्रवारच्या घटनेनंतर बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातील काही निवडक भागात बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी हिंसक घटनांशी संबंधित ११८ जणांना अटक केली आहे. अटकेची कारवाई अद्याप सुरू आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Anti waqf protest)
पोलिस महासंचालक राजीव कुमार यांनी हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. ते म्हणाले की, आज सकाळी घडलेली घटना दुर्दैवी आहे. अनेक ठिकाणी अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे ही घडली असावी. चिथावणीखोरांना लोकांनी बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. कुमार पुढे म्हणाले, ही चांगल्या आणि वाईटादरम्यानची लढाई आहे. अफवा पसरवणे थांबवले पाहिजे. लोकांनी शांतता पाळावी, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये. पोलिस गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करतील आणि सामान्य लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करतील, अशी आम्ही जनतेला खात्री देतो.
हेही वाचा :
राखून ठेवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी ३ महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा
ट्रॅकर्सचा धोका ओळखून राणाला कसे आणले?