मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील लाखो माता-भगिनींची घोर फसवणूक केली आहे. लाभार्थींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो माता भगिनींची फसवणूक केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. (Patole criticise CM)
सरकारने लाडक्या बहीण योजनेतून ५ लाख बहिणींना अपात्र केले आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने मतांसाठी सरसकट सर्व बहिणींना १५०० रुपये देऊन त्यांची मते घेतली. सत्तेवर आल्यानंतर मात्र या बहिणींना दिलेल्या मदतीला कात्री लावण्याचे पाप केले आहे. निवडणुकीनंतर भाजपा महायुती त्यांचे खरे रंग दाखवणार असे आम्ही सातत्याने बजावले होते. शेवटी महायुतीच्या भावांनी लाडक्या बहिणींना सावत्रपणाची वागणूक देण्यास सुरुवात केली आहे. योजना लागू करतानाच निकष ठरवले जातात, पण मते मिळवण्यासाठी शिंदे भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आता सत्ता मिळाल्यानंतर मात्र निकष लावून बहिणींचे पैसे बंद केले जात आहेत, हे दुर्दैवी आहे. (Patole criticise CM)
फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली का करतात?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानात झालेल्या घोटाळ्याची आकडेवारीसह मांडणी केली. निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले. राज्याच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त कशी? वाढलेल्या मतदारांची यादी फोटो, नावे पत्त्यांसह द्यावी, तसेच संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मते कशी वाढली? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर निवडणूक आयोग उत्तरे देत नाही. आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट दिसत आहे, यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या? भाजपाने निवडणूक आयोगाचे वकीलपत्र घेतले आहे का? निवडणूक आयोग ही स्वायस्त संस्था आहे. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत, अशी मागणीही पटोले यांनी केली.
हेही वाचा :
दिल्लीत भाजपचा ऐतिहासिक विजय
मिल्कीपूर पोटनिवडणुकीतही भाजप
‘लाडकी बहीण योजने’त चार पुरुष