नेपिडो : म्यानमारमध्ये भूकंपाने हाहाकार उडाला. मोठी पडझड झाल्याने मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. अडीच हजारावर लोक जखमी झाले आहेत. म्यानमारच्या जंटा सरकारने मृतांचा आकडा १६४४, तर २,३७६ लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे.( Myanmar toll rise)
शुक्रवारी (२८ मार्च) म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. त्यामुळे प्रचंड विध्वंस झाला. कालपासून जखमींचा ओघ सुरू आहे. शनिवारीही (२९ मार्च) तो कायम आहे. मदत आणि बचाव कार्यातील पथके अव्याहत काम करीत आहेत. कोसळलेल्या इमारतींखाली दबलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकातील कर्मचारी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही झटत आहेत. ( Myanmar death toll)
बँकॉकमध्येही असेच चित्र आहे. चतुहाकमध्ये बांधकामाधीन बहुमजली इमारत कोसळली. तिच्या ढिगाऱ्याखाली किमान १५ लोक अडकलेले आहेत. दरम्यान शेजारच्या देशांमधून आणि परदेशातूनही म्यानमार आणि थायलंडमध्ये मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
अनेकजण बेपत्ता, नातेवाईकांचा आक्रोश
या दुर्घटनेत अनेकजण बेपत्ता झाले आहेत. अशांसाठी नोंदणी कक्ष उभारण्यात आला आहे. तेथे नातेवाईकांची गर्दी दिसत आहे. प्रियजनांच्या आठवणींनी त्यांना हुंदके अनावर होत आहेत. परिसरात सर्वत्र आक्रोश सुरू असल्याचे चित्र दिसते.
या कक्षासमोर अनेकजण नुसते स्तब्ध बसून आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी स्पष्टपणे दिसते. त्यांचे डोळे डबडबलेले दिसत आहेत. अनेकजण धाय मोकलून रडत आहेत. ( Myanmar death toll)
नोंदणी होईल तसे डेस्कच्या मागे ठेवलेल्या व्हाईटबोर्डवर आकडा लिहिला जात आहे. अधिकारी बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत. शनिवारी सकाळपर्यंत ९६ जण बेपत्ता असल्याची, तर आठ जणांचा मृत्यू झाल्याची खात्री झाली आहे. आठ जण जखमी आहेत.
दरम्यान, पीपल्स डिफेन्स फोर्सने म्हटले आहे की म्यानमारमध्ये हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ले सुरूच आहेत. २०२१ मध्ये झालेल्या बंडानंतर देश लष्करी राजवटीत आहे.
वीज पुरवठा खंडीत
शक्तिशाली भूकंपामुळे पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहे. त्यातच वीज पुरवठा खंडीत झाल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेल्या यांगून विद्युत पुरवठा महामंडळाच्या वीज वितरणाचे काम पाहणाऱ्या महामंडळाने रोज केवळ चार तासच वीज पुरवठा करण्यात येईल असे जाहीर केले आहे.
मंडाले आणि यांगूनच्या रहिवाशांनी सांगितले की भूकंपानंतर पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला होता आणि टेलिफोन लाईन्स बंद पडल्या होत्या. मंडालेमध्ये वीज पुरवठा तत्काळ सुरू करणे अशक्य आहे. कारण तेथे मोठी पडझड झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस वीज पुरवठ्याचा प्रश्न भेडसावणार आहे.
हेही वाचा :
भारताकडून म्यानमारला १५ टन मदत साहित्य