नवी दिल्ली : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विधानसभेतील दारुण पराभवनातंर काँग्रेसने संघटनात्मक बदलास सुरुवात केली आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मंजूर केल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने सपकाळ यांची निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसने विदर्भावर पुन्हा विश्वास टाकला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे शिवधनुष्य सपकाळ यांना पेलावे लागणार आहे. (MCC President)
पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याची काँग्रेस वर्तुळात चर्चा होती. इच्छुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील आमदार विश्वजित कदम यांचे नावही चर्चेत आघाडीवर होते. आतापर्यंत विदर्भाला प्रदेशाध्यक्षपद दिल्याने नवीन प्रदेशाध्य पश्चिम महाराष्ट्राला द्यावे अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू होती. आमदार विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचीही नावे चर्चेत होती. पण काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत हर्षवर्धन सपकाळ याचे नाव पुढे आणले आणि त्यावर गुरुवारी सायंकाळी शिक्कामोर्तब झाले. (MCC President)
हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांची कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी झाली आहे. १९९९ ते २००२ या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील सर्वांत तरुण अध्यक्ष म्हणून त्यावेळी त्यांची ओळख होती. २०१४ ते २०१९ या काळात ते काँग्रेसचे आमदार होते. सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज्य संघटनेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सर्वोदय विचारावर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिराचे आयोजन, ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रीय सहभागाचा त्यांचा अनुभव आहे. बुलढाण्याचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प त्यांनी मतदारसंघात राबवला होता.
हेही वाचा :