रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील केरलापाल भागात शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १८ माओवाद्यांना कंठस्नान घातले. (Maoists killed)
जिल्हा राखीव रक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांनी ही संयुक्त कारवाई केली. या भागात माओवादी लपलेले असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरू केलेल्या संयुक्त माओवादविरोधी मोहिमेवेळी सुरक्षा दलांशी चकमक सुरू झाली. दोन स्वतंत्र घटनांमध्ये चार जवान जखमी झाले आहेत. (Maoists killed)
अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला. संयुक्त पथक २८ मार्च रोजी या भागात दाखल झाले. शनिवारी पहाटेपर्यंत सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू होती. माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.
यशस्वी कारवाईनंतर, चकमकीच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या जंगली भागात शोध घेण्यासाठी शोध पथके तैनात करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती समजेल.
छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील सर्वात जास्त माओवादग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या सुकमामध्ये गेल्या काही वर्षांत माओवादी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये अनेक हिंसक चकमकी झाल्या आहेत.(Maoists killed)
माओवाद्यांनी केलेल्या इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) स्फोटात नारायणपूर जिल्ह्यात एक सैनिक जखमी झाल्यानंतर ही चकमक घडली.(Maoists killed)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, नक्षलविरोधी कारवाया अंतिम टप्प्यात आहेत. मार्च २०२६ पर्यंत देशातून माओवाद पूर्णपणे नष्ट केला जाईल, असा दावा केला आहे.
- माओवाद्यांविरोधात कारवाया
- १ मार्च रोजी सुकमाच्या किस्ताराम पोलिस स्टेशन हद्दीत दोन माओवाद्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले.
- फेब्रुवारीमध्ये बस्तर प्रदेशात नक्षलविरोधी कारवायांमध्ये वाढ झाली आणि किमान ४० माओवाद्यांना निष्क्रिय करण्यात आले.
- ९ फेब्रुवारी रोजी, विजापूरमध्ये १.१० कोटी रुपयांचे बक्षीस असलेले विक्रमी ३१ बंडखोर ठार झाले.
- इतर प्रमुख कारवायांमध्ये ३ फेब्रुवारी रोजी कांकेर-नारायणपूर येथे ८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका माओवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. त्याआधी, १ फेब्रुवारी रोजी विजापूरच्या गंगालूर येथे आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता..(Maoists killed)