Home » Blog » Dog Vaghya : वाघ्या कुत्र्याचा पुतळा संवैधानिक मार्गानेच हटवणार

Dog Vaghya : वाघ्या कुत्र्याचा पुतळा संवैधानिक मार्गानेच हटवणार

माजी खासदार संभाजीराजे यांची माहिती

by प्रतिनिधी
0 comments
Dog Vaghya

दिल्ली : प्रतिनिधी : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याच्या समाधीबाबत पुरातत्व विभागाकडे कुठलीही माहिती नाही. वाघ्या कुत्र्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राणत्याग केल्याची दंतकथा सांगितली जाते. त्याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही. पुतळा हटवण्याबाबत मी कुठलाच अल्मिमेटम दिलेला नाही. आम्ही संवैधानिक मार्गानेच हा पुतळा हटवणार आहोत. कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही, याचे आश्वासन मी देतो. त्यामुळे गैरसमज निर्माण करणाऱ्या लोकांना कुणीही बळी पडू नये, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले. (Dog Vaghya)

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ मे पर्यंत हटवावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केल्याने राज्यात वादळ उठले आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, या मागणीचे पत्र संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. बुधवारी (२६ मार्च) याच संदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. यावेळी विभागाचे इतर वरिष्ठ संचालक व अधिकारीही उपस्थित होते. गडावरील हा कथित कुत्रा व त्याच्या समाधीबाबत पुरातत्त्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Dog Vaghya)

माजी खासदार संभाजीराजे यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून जुनी असलेली वास्तू ही ऐतिहासिक संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते. मात्र कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळात १९३६ साली उभारण्यात आली आहे. त्यामुळे तिला १०० वर्षे पूर्ण होण्याआधी काढणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यातील काही मंडळींनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. ते काम १९२६ साली पूर्ण झाले, पण हा कुत्र्याचा पुतळा त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९३६ साली तिथे बसविला गेला. (Dog Vaghya)

संभाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का?
राजसंन्यास या नाटकातील एका कुत्र्याच्या काल्पनिक पात्राचा संदर्भ घेऊन हा पुतळा तिथे उभारला आहे. या नाटकाने सर्वात प्रथम छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी सुरू केली. त्यांच्या चारित्र्यावर डाग लावले गेले. अशा नाटकाचा आज काही जणांना त्या कुत्र्यासाठी पुळका आला आहे. मग त्यामध्ये केलेली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी देखील त्यांना मान्य आहे का ? (Dog Vaghya)
छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील निश्चितपणे अनेक कुत्री पाळली असतील. पण म्हणून थेट त्यांच्या समाधीला लागून कुत्र्याचा पुतळा उभा करायचा, आणि तो सुद्धा महाराजांच्या समाधीपेक्षाही उंच! हे पटण्यासारखे नाही. स्वराज्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांच्या समाध्या आज कुठे नाहीत. आणि एका काल्पनिक कुत्र्याची समाधी महाराजांच्या समाधीसमोर उभारणे हे योग्य आहे का? हा महाराजांचा आणि त्या हजारो लाखो मावळ्यांचा अपमान नाही का? असा प्रश्नही संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. (Dog Vaghya)

तुकोजीराव होळकरांनी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोध्दारांसाठी पैसे दिले
इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले होते.  कुत्र्याच्या समाधीसाठी दिले नव्हते.  त्यांनी कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले होते हे म्हणणे म्हणजे तुकोजीराव होळकरांचा अपमान आहे. तुकोजीराव होळकर हे मोठे शिवभक्त होते. छत्रपती शाहू महाराजांनी जे पहिले मराठी शिवचरित्र लिहून घेतले होते, त्याचे त्यांनी इंग्रजी भाषांतर करून ते पुस्तक देशभरातील ग्रंथालयांना स्वखर्चाने पाठवले होते. इतका मोठा शिवभक्त माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर चक्क एका कुत्र्याची समाधी बांधायला सांगू शकेल का ? तुकोजीरावांबद्दल असे बोलणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या शिवभक्तीचा अपमान आहे. त्यामुळे विनाकारण काही लोकांनी या विषयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. (Dog Vaghya)

छत्रपती आणि होळकर घराण्याचे जुने ऋणानुबंध

छत्रपती घराणे आणि होळकर घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचे लग्न याच तुकोजीराव होळकरांच्या मुलाशी लावून दिलेले होते. हा पहिला आंतरजातीय विवाह होता. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी होळकरांचे सध्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह आपल्या राजवाड्यात लावून दिलेला होता. आजपर्यंत छत्रपती घराण्यातील सदस्यांव्यतिरिक्त कुणाचाही विवाह छत्रपतींच्या राजवाड्यात झालेला नाही. फक्त श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह झालेला आहे. छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जवळचे संबंध आहेत. (Dog Vaghya)

धनगर बांधवांची दिशाभूल करु नये

इतिहासापासून ते आजपर्यंत धनगर समाज हा छत्रपती घराण्याचा अत्यंत विश्वासू आणि लाडका समाज राहिलेला आहे. आजही आमच्याकडे विविध पदांवर अत्यंत विश्वासाने कार्यरत असलेले जवळपास निम्मे लोक धनगर समाजातील आहेत. त्यामुळे धनगरांच्या द्वेषामुळे आम्ही हा मुद्दा घेतलाय असे सांगून आमच्या धनगर बांधवांची दिशाभूल करू नये. विनाकारण जातीय रंग देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर कुत्र्याचा पुतळा बघणे हे कोणत्या शिवभक्त धनगर बांधवाला आवडणार आहे ? (Dog Vaghya)

महाराजांच्या रक्षेचे लॅबमध्ये परीक्षण
शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना महाराजांच्या रक्षा मिळाल्या होत्या. त्यावेळी या रक्षा कोलकाता येथील लॅबमध्ये परिक्षणासाठी पाठविल्या होत्या. त्या लॅबच्या रिपोर्टमध्ये या रक्षांमध्ये श्वानाचे अवशेष आढळून आलेले नाहीत. त्यामुळे शिवरायांच्या चितेत कुत्र्याने उडी घेऊन जीव दिला होता या दंतकथेला काही अर्थ राहत नाही. (Dog Vaghya)

३१ मे चा अल्टिमेटम दिलेला नाही
माझ्या पत्रात अल्टिमेटम वगैरे असा काही उल्लेख नाही, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.  राज्य शासनाने गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी धोरण जाहीर केलेले आहे.  या धोरणानुसार ३१ मे पर्यंत सर्व अतिक्रमणे हटवली जाणार, असे राज्य शासनानेच जाहीर केलेले आहे. ही तारीख राज्य शासनाची आहे. त्यामुळे त्यांनीच दिलेल्या तारखेच्या आधी हे अतिक्रमण काढावे, अशी मी मागणी केलेली आहे. हा अल्टिमेटम नाही. या तारखेमुळे देखील काही विघ्नसंतोषी लोक गैरसमज निर्माण करू पाहत आहेत.  आम्ही संवैधानिक मार्गानेच हा पुतळा हटवणार आहोत. कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही, याचे आश्वासन मी देतो. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला कुणीही बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. (Dog Vaghya)

हेही वाचा :

 जयकुमार गोरे प्रकरणाची ए टू झेड स्टोरी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00