मुंबई : कर्जमाफीची घोषणा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या तोंडाची वाफ आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत आ. पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या शेतकरीविरोधी धोरणांचा चांगलाच समाचार घेतला आहे.(JAYANT PATIL ATTACKS MAHAYUTI)
पाटील यांनी म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीनदोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे?
शेती साहित्य खरेदी करताना शेतकऱ्याला महागाईची झळ बसते. त्याला जीएसटीचा भुर्दंड भरावा लागतो. खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्याने ओळखले आहे. सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच, पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल बनवले आहे. हे चित्र अत्यंत करुण आहे. आपल्या अन्नदात्याच्या घामाचे मोल हेच काय?, असा संतप्त सवालही पाटील यांनी केला आहे. (JAYANT PATIL ATTACKS MAHAYUTI)
एकाबाजूला श्रीमंत, धनदांडग्या लोकांसाठी सरकार खैरात वाटत सुटले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी कुटुंब १ – २ लाखांच्या कर्जपायी घरचा आधार गमावत आहेत. शेतकरी स्व. हरिदास बोंबले यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली. (JAYANT PATIL ATTACKS MAHAYUTI)
तसेच सरकारने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तत्काळ फौजदारी खटला दाखल केला पाहिजे. शेतकऱ्याला नुकसानीचा परतावा कंपनीकडून मिळालाच पाहिजे ही आमची मागणी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बेभरवशी निसर्ग, शेतीमालाचे पडलेले भाव, कर्जाचा वाढता डोंगर आणि संसार चालविण्यात येणाऱ्या अडचणी अशा विवंचनेत राज्यातील शेतकरी आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र राज्यात सुरूच आहे. गेल्या बारा वर्षांत जिल्ह्यात तब्बल १ हजार ५७३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून एक लाखाचा धनादेश देऊन तोंडाला पाने पुसण्यात येतात; परंतु या कुटुंबाची कधीही भरून न येणारी हानी या तुटपुंज्या मदतीत कशी भरून निघणार, असा सवाल शेतकरी कुटुंब आणि शेतकरी संघटनांकडून वारंवार व्यक्त करण्यात येतो. मात्र शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार मात्र पुरेसे गंभीर दिसत नाही, या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी : सपकाळ
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथाल हरिदास विश्वंभर बोंबले या शेतकऱ्याने केलेली आत्महत्या ही आत्महत्या नाही; तर सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंबंधीची पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, बोंबले यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही. यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. हरिदास बोंबलेंची आत्महत्या ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! सरकारने कुंभकर्णी झोपेतून आणि राक्षसी बहुमताच्या नशेतून बाहेर पडून निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे, असे आवाहनही सपकाळ यांनी केले आहे.
हेही वाचा :
उदयनराजेंवर टीकेची झोड
बंदुकीच्या धाकावर कधीही वाटाघाटी करणार नाही