मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१४ एप्रिल) केले.(Ambedkar Statue Unveiled)
वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिल सेलवन आदी उपस्थित होते. (Ambedkar Statue Unveiled)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी राज्य शासन इंदू मिल येथे त्यांचे भव्य स्मारक साकारत आहे. त्यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. संविधानाच्या तत्त्वावर देशाचा कारभार सुरू आहे. या संविधानानेच देशाच्या महासत्तेचा मार्ग प्रशस्त केला. बाबासाहेबांचा पुतळा हा संविधानाशिवाय अपूर्ण असतो. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून शोषित, पीडित लोकांना न्याय देण्याचे काम केले. संविधानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली. संविधान निर्माण करताना त्यांची दूरदृष्टी आणि असामान्य बुद्धीची प्रगल्भता लक्षात येते. (Ambedkar Statue Unveiled)
मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांचा पहिला सत्कार मुंबईत झाला. एवढेच नव्हे तर, केंद्रीय मंत्री, प्रांतिक अध्यक्ष, गोलमेज परिषदेवरून देशात परत आल्यावर, राज्यघटना पूर्ण करून परत आल्यानंतर अशा अविस्मरणीय क्षणी बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार मुंबईमध्येच झाला. बाबासाहेब यांनी वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिवादन सभाही मुंबईतच झाली होती,असे सांगून ते म्हणाले, ‘बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनपटात त्यांना उजाळा देणारे, त्यांच्या स्मृती जागविणारे अनेक प्रसंग मुंबईने अनुभवले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि प्रिंटिंगही मुंबईतच झाले. त्यांच्या राजकीय आयुष्याचे अनुष्ठान हे मुंबईतूनच सुरू झाले.
प्रास्ताविक आमदार कालिदास कोळंबकर यांनी केले.
हेही वाचा :
आंबेडकरांच्या चळवळीत व्यक्तिमत्त्व पुनर्स्थापनेचा विचार
काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष का केला नाही?