आदरणीय देवेंद्रजी,
आपले हे म्हणणे अगदी रास्त आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. छत्रपती शिवरायांचा आणि क्रांतीसूर्यांच्या रक्ताचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रावर ज्ञानोबा , तुकोबा ,संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचे संस्कार झालेले आहेत. महाराष्ट्र भूमी ही संतांची, शूरवीरांची, विचारवंतांची आणि अठरापगड जाती-धर्माच्या अढळ कष्टकऱ्यांची भूमी आहे. या राज्याचा वारसा इतका थोर आहे की, कोणाच्याही एका वक्तव्याने किंवा राजकारणाने महाराष्ट्र कधीच बदनाम होऊ शकत नाही आणि होणारही नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि प्रतिष्ठा हिमालयासारखी अढळ आहे.
परंतु, आज जेव्हा आम्ही ‘बदनामी’ शब्द वापरतो, तेव्हा तो राज्याच्या गौरवाबद्दल नसून, इथल्या गल्लीबोळात घडणाऱ्या भीषण वास्तवाबद्दल असतो. हे वास्तव नाकारणे म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधण्यासारखे आहे.
आपण अजून किती काळ डोळ्यांवर कातडे ओढून बसणार आहोत? विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी, माध्यमांनी दाखवले की ती बदनामी… मग जनतेने मरायचे का? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्ज विकणारे पेडलर्स आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या माशांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. (Raju Shetty’s letter to Fadnavis)
मुंबईचे किनारे असोत, पुण्याचे पब-कट्टा संस्कृती असो, नाशिक-संभाजीनगर सारखी शहरे असोत , औद्योगीक वसाहती असोत , शाळा -कॅालेज असोत की ग्रामीण भाग—ड्रग्जचे जाळे आता प्रत्येकाच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. आज अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील तरुण मुले या विळख्यात अडकली आहेत. आपली मुले डोळ्यांदेखत बरबाद होताना पाहून हतबल झालेले आई-बाप रात्री रडत आहेत. ही बदनामी नाही, हा त्या कुटुंबांचा आक्रोश आहे. तुम्ही मंत्रालयात बसून बदनामीची भाषा करत आहात, पण इथल्या झोपडपट्ट्यांपासून ते हाय-फाय सोसायट्यांपर्यंत, एका बापाची कमाई आणि आईचे कुंकू ड्रग्जच्या विळख्यात रोज जळून खाक होत आहे. ज्या हातांनी म्हातारपणी काठी व्हायचे, ते हात आज ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत. हे पाप कोणाचे?
१४ ते २२ वयोगटातील पोरांनी हत्या केलेल्या मयतांच्या वारसांशी आणि आरोपी असलेल्या पोरांच्या आईबापाशी मी स्वत: भेटलेलो आहे बोललेलो आहे. त्यांच्याकडून वस्तुस्थिती ऐकल्यानंतर मी हादरून गेलो त्याचबरोबर दुनियादारी माहित नसणाऱ्या ७ वी ८ वीच्या खेड्यातील निरागस पोरांच्या हातात अमली पदार्थ बघितल्यानंतर ही व्यवस्था किती सडलेली आहे हे सत्य समजल्यानंतर मन अस्वस्थ झालं आणि म्हणून जेव्हा नागरिक, माध्यमं किंवा विरोधक यावर बोलतात, तेव्हा तो केवळ राजकीय आरोप नसतो. ती आपल्या घरातील मुलाबाळांच्या सुरक्षेची चिंता असते. (Raju Shetty’s letter to Fadnavis)
देवेंद्रजी,
महाराष्ट्र कधीच बदनाम होणार नाही, कारण या मातीची ताकद मोठी आहे. पण या मातीतील तरुण जर अंमली पदार्थांच्या नशेत संपून गेला, तर हा प्रगतीशील महाराष्ट्र पुढे कोण नेणार?
एक सक्षम गृहमंत्री आणि राज्याचे नेते म्हणून, आपण ही बदनामीची लढाई म्हणून न पाहता, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आणि तरुण पिढीला वाचवण्याची लढाई म्हणून पाहावी. सत्य स्वीकारून यावर निर्णायक प्रहार करावा, छत्रपती शिवाजी महाराज आणि साधू-संतांच्या या महाराष्ट्रात तरुण पिढी अशी उघड्यावर पडू नये, हीच प्रत्येक मराठी माणसाची व महाराष्ट्राची भावना आहे.
तुमचाच
( राजू शेट्टी . मा. लोकसभा सदस्य )