चंदन आणि शोएब हे दोघे मित्र आहेत. दोघंही पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत असतात.
शोएबचा जवळचा नातेवाईक पोलीस खात्यात अधिकारी असतो. त्याच्याकडून काही मदत होईल या आशेनं तो त्याच्याकडं जातो. तेव्हा तो अधिकारी नातलग त्याला सांगतो की, एका जागेसाठी सातशेहून अधिक जणांमध्ये स्पर्धा आहे. सगळी प्रक्रिया राज्य पातळीवरून होते. तिथं माझा कुणाचा परिचय नाही. त्यामुळं वडिलांचं ऐक आणि दुबईला जा.
त्यावर शोएब त्यांना विचारतो, `तुम्हाला वाटलं नाही का कधी दुबईला जावं?` (Homebound)
-`मलाही वाटलं. पण बाहेर जाऊन स्वतःला बदलण्यापेक्षा इथं राहून आतून काही बदलणं चांगलं म्हणून मी इथंच राहिलो. आपले पूर्वज इथंच जगले. इथल्याच मातीत दफन झाले. त्यांचे आशीर्वाद या हवेत आहेत.`
शोएब म्हणतो- `घराजवळची अजान ऐकताना वाटतं, कुणी वडिलधा-या माणसानं डोक्यावर हात धरलाय. अम्मी टॉमॅटोची चटणी बनवते, त्याचा जो घमघमाट असतो तो दुबईच काय जगात कुठं मिळणार नाही. आपली माती, हवा, रस्ते, यारदोस्त, आपली भाषा हे सगळं मिळून तर आपलं घर आहे. हे सगळं सोडून कसं जायचं…?` (Homebound)
हा संवाद नुसता तरल आणि काव्यात्मक म्हणून सोडून देता येणार नाही. आपल्या मातीबद्दल, अवतीभवतीच्या माणसांबद्दल किती ओतःप्रोत जिव्हाळा भरून राहिलाय हे त्यातून दिसतं. इथल्या हवेच्याही प्रेमात असलेल्या समाजाबद्दल इथले बहुसंख्य किती विखारी विचार करीत असतात, याची तीव्र जाणीव इथं झाल्यावाचून राहात नाही.
वेगळा सिनेमा (Homebound)
`होमबाऊंड` हा नीरज घायवानचा सिनेमा नेटफ्लिक्सवर आलाय. त्याबद्दल आपण बोलतोय.
नीरज घायवान हा भयंकर त्रासदायक दिग्दर्शक आहे. अनुराग कश्यपच्या तालमीत तयार झालेल्या या गृहस्थाची सामाजिक प्रश्नांबाबतची, माणसाच्या रोजच्या जगण्यावर होणा-या त्याच्या परिणामांची जी समज आहे, ती आजच्या काळात दुर्मिळातली दुर्मीळ म्हणावी अशी आहे. तो कुठला झेंडा मिरवत नाही. पण आपल्याला जे म्हणायचंय ते थेटपणे कुठलाही आडपडदा न ठेवता मांडतो. सामाजिक प्रश्नांना भिडणारे दिग्दर्शक म्हणून आपल्याकडं ज्यांचा गवगवा केला जातो, त्यातले अनेकजण नीरज घायवानसमोर उघडे पडतात.
बनारस आणि गंगा नदी ही निव्वळ पार्श्वभूमीपुरती, तिथल्या विहंगम दृश्यांपुरती, साधु-गोसाव्यांच्या फुटेजपुरती वापरली जात असल्याच्या काळात तो `मसान`मधून बनारसच्या जगण्यातले अनेक पदर उलगडून दाखवतो. आपल्या सांस्कृतिक परंपरेत गंगेचा एकटीचा विचार कधी होत नाही. गंगा-यमुनेचा एकत्रित उल्लेख होत असतो. तसंही कुणाचं जगणं एकट्यानं एकमार्गी नसतंच. त्याला समांतर काहीतरी वाहत असतं, ते पूरक आणि आवश्यकही असतं. `मसान`मध्ये असे दोन प्रवाह दिसले.
`होमबाऊंड` मध्येही असेच दोन प्रवाह समांतर वाहताना दिसतात. अलीकडच्या काळात इतका त्रास खचितच एखाद्या कलाकृतीनं दिला असेल. झोप उडवून टाकणारा, आतून हलवूनच नव्हे, तर उदसून टाकणारा असा हा सिनेमा आहे.
`मसान`मध्ये जसे दोन प्रवाह आहेत
तसेच होमबाऊंडमध्येही दोन प्रवाह आहेत. दोन मित्रांचे. त्यांच्या जगण्याच्या संघर्षाचे. (Homebound)
चंदन दलित आहे. शोएब मुस्लिम. या दोन्ही समाजघटकांना रोजच्या जगण्यात कोणत्या संघर्षातून जावं लागतं, ते होमबाऊंड दाखवतो. कुठंही भाषणबाजी न करता. कसलाही आव न आणता. एका छोट्या खेड्यापासून शहरापर्यंतचा आणि तिथून परत खेड्यापर्यंतचा हा प्रवास आहे. वर्तमानातल्या जगण्यातले पेच मांडायचे तर ते मुळात समजून घ्यावे लागतात. त्यासाठी तेवढी आकलनक्षमता लागते. नीरज घायवाननं `मसान`मध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. `होमबाऊंड` हा त्यापुढचा टप्पा आहे. इथं खोटं काही दाखवलं जात नाही. अगदी प्रेमही. एका मित्राला नोकरी लागली म्हणून दुसरा पेढे वाटत नाही. आपली संधी गेली म्हणून तो दुखावला जातो. सिनेमात न पटण्याजोगं असं वास्तव नीरज घायवान दाखवतो.
खरंतर हा करोनाकाळातला सिनेमा आहे. त्या काळात कष्टकरी समूहांवर संकटांचा जो डोंगर कोसळला त्याचंही अस्वस्थ करणारं चित्रण सिनेमा करतो. पण दोन तासांच्या सिनेमात करोना अखेरच्या चाळीस मिनिटात येतो. त्याआधी आहे तो आपल्या समाजाचा आरसा.
दलितांना कसं पदोपदी हेटाळणीला सामोरं जावं लागतं. आरक्षणावरून टोमणे खावे लागतात. ते इतके जिव्हारी लागणारे असतात की अनेकदा जात लपवून जगावं लागतं. दुसरीकडं अल्पसंख्यांकांच्याकडं बघण्याची शिक्षित समाजाची दृष्टी किती दूषित बनली आहे, हेसुद्धा दिसतं. दोन्ही समाजघटकांबद्दल द्वेष बाळगणारा मोठा वर्ग आपल्याकडं आहे. त्यांच्याकडून अपमानाचे घोट पचवत हे समाजघटक इथं जगत असतात. इथल्या मातीवर, माणसांवर प्रेम करीत असतात. (Homebound)
चंदन आणि शोएबच्या जगण्याचे दोन प्रवाह. त्या माध्यमातून समाजातली कुरुपता टोकदारपणे सिनेमात मांडलीय. त्याचबरोबर माणसांचा चांगुलपणा आणि माणूसकीही आहे.
एकुणात झोप उडवणारा हा सिनेमा आहे.
नीरज घायवानला कडक सॅल्यूट!